Indigo : इंडिगोची 550 हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवाशांची गर्दी, गोंधळ अन् मनस्ताप, एअरलाइन म्हणतंय..
इंडिगोची विमान उड्डाणं रद्द होण्याचं सत्र सुरूच आहे. 4 नोव्हेंबर रोजी एअरलाइनने 550 हून अधिक विमानं रद्द केल्याचं समजतंय. यादरम्यान आता इंडिगो एअरलाइनकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. यात त्यांनी काय म्हटलंय, जाणून घ्या..

देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी फेब्रुवारी उजाडेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. इंडिगोची विमानसेवा सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत राहिल्यानंतर गुरुवारी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. दिवसभरात दिल्ली, मुंबई, बंगळुरूसह देशातील अन्य विमानतळांवरून 550 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. यापैकी जवळपास 191 उड्डाणे दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद मार्गांवरील होती. मोठ्या प्रमाणात उड्डाणं रद्द झाल्यामुळे विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला. यादरम्यान इंडिगो एअरलाइनने एक निवेदन जारी केलं आहे.
या निवेदनात इंडिगोने म्हटलंय, ‘गेल्या दोन दिवसांत इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये प्रचंड व्यत्यय आला आहे. यामुळे प्रभावित झालेल्या आमच्या सर्व ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो. इंडिगो टीम MOCA, DGCA, BCAS, AAI आणि विमानतळ ऑपरेटर्सच्या मदतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे. परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.’
दिल्ली विमानतळावरून 172, मुंबईतून किमान 118, बंगळुरूमधून 100, हैदराबादमधून 75, कोलकात्यामधून 35, चेन्नईमधून 26 आणि गोव्यातून 11 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं. याशिवाय अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला. यामुळे देशभरातील विमानतळांवर हजारो प्रवाशांना तासनतास रखडावं लागलं आणि मनस्ताप सहन करावा लागला. सर्वत्र प्रवाशांची गर्दी, गोंधळ आणि मनस्ताप असं चित्र दिसलं.
The last two days have seen widespread disruption across IndiGo’s network and operations. We extend a heartfelt apology to all our customers and industry stakeholders who have been impacted by these events. IndiGo teams are working diligently and making all efforts with the…
— IndiGo (@IndiGo6E) December 4, 2025
इंडिगोने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली त्यावर हवाई वाहतूक मंत्री नायडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कंपनीला आपलं कामकाज तातडीने सुरळीत करण्याचे तसंच भाडेवाढ न करण्याचे निर्देश दिले. विमान रद्द होण्यासंबंधी प्रवाशांना आगाऊ सूचना दिल्या जाव्यात, हॉटेलमध्ये निवासासह प्रवाशांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असं नायडू यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांना बजावलं.
नागरी हवाई वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सद्यस्थिती आणि उपाययोजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी इंडिगोने डीजीसीएला सांगितलं की, 8 डिसेंबरपासून विमान उड्डाणांची संख्या कमी केली जाईल, तसंच 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ववत स्थिर विमानसेवा सुरू होईल.
