माझ्या आक्षेपानंतरही त्यांनी..; ‘रांझना’चा क्लायमॅक्स बदलल्याने भडकला धनुष

'रांझना' या चित्रपटाचा शेवट एआयच्या मदतीने बदलून तो पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. यावरून त्यातील मुख्य अभिनेता धनुषने तीव्र संताप व्यक्त केला आहे. याविषयी त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

माझ्या आक्षेपानंतरही त्यांनी..; रांझनाचा क्लायमॅक्स बदलल्याने भडकला धनुष
Dhanush and Sonam movie Ranjhanaa
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2025 | 10:05 AM

दिग्दर्शक आनंद एल. राय यांचा ‘रांझना’ हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळालं. त्यातील भूमिका, गाणी, संवाद आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. एकतर्फी प्रेमाची मनाला भिडणारी गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली होती. त्याच्या शेवटाने अनेकांना रडवलं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा तमिळ व्हर्जन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. परंतु यात फार मोठा बदल करण्यात आला आहे. याच बदलावरून चित्रपटातील मुख्य अभिनेता धनुषने तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. दिग्दर्शक आनंद एल. राय यांनीसुद्धा सोशल मीडियाद्वारे आक्षेप घेतला आहे.

एआयच्या मदतीने बदलला क्लायमॅक्स, चिडला धनुष

सध्या थिएटरमध्ये दाखवण्यात येणाऱ्या ‘रांझना’च्या तमिळ व्हर्जनचा क्लायमॅक्स AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने बदलण्यात आला आहे. यामध्ये हिरो कुंदन (धनुष) जिवंत होतो. मूळ चित्रपटात रुग्णालयातच धनुषचा मृत्यू होतो. परंतु एआयचा वापर करून कथेत असा बदल केल्याने दिग्दर्शक आणि कलाकारांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. या अनपेक्षित बदलामुळे त्यांना फार मोठा धक्का बसला आहे.

याविषयी धनुषने त्याच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. सिनेमाच्या प्रेमापोटी असं कॅप्शन देत त्याने म्हटलंय, ‘AI च्या मदतीने क्लायमॅक्स बदलून ‘रांझना’चा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केल्याच्या घटनेनं मी पूर्णपणे अस्वस्थ झालो आहे. या बदलाने चित्रपटापासून त्याचा मूळ आत्माच काढून टाकला आहे. मी स्पष्ट आक्षेप नोंदवल्यानंतरही संबंधित लोकांनी हे काम केलंय. 12 वर्षांपूर्वी मी अशा चित्रपटाला होकार दिला नव्हता. चित्रपट किंवा त्यातील कंटेट बदलण्यासाठी एआयचा जो वापर केला जातोय, ते कला आणि कलाकारांसाठी अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे कथाकथनाच्या प्रामाणिकतेला आणि चित्रपटाच्या वारशाला धोका आहे. भविष्यात अशा गोष्टी होऊ नयेत, यासाठी कठोर नियमावली आखण्यात यावी, अशी मी आशा करतो.’

या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘Ambikapathy’. या चित्रपटाचा क्लायमॅक्स एआयच्या मदतीने बदलण्यात आला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या मदतीने हा बदल करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट रोजी हा नवीन बदल असलेला चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नव्या व्हर्जनमध्ये मृत्यूच्या दारात उभा असलेला कुंदन त्याचे डोळे उघडतो आणि उठून बसतो. त्याचे मित्र बिंदिया (स्वरा भास्कर) आणि मुरारी (झीशान अयुब) त्याला पाहून आनंदाने रडू लागतात. या चित्रपटाचा शेवट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.