
सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत.. सर्वत्र केवळ आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ याच चित्रपटाची चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर 19 मार्च रोजी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक सीन्स व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक सीन हा क्लायमॅक्सचा आहे. ‘धुरंधर 2’चा शेवट एका शांत आणि भावूक वळणावर होतो. रणवीर सिंहची भूमिका हमजा अली मजारी पाकिस्तानात त्याचं मिशन पूर्ण करून भारतात परत येतो. जसकीरत सिंह रंगी ही खरी ओळख घेऊन तो मायदेशी परततो.
या अत्यंत भावूक वळणावर या चित्रपटाचा शेवट होतो, ज्यामध्ये जसकीरत त्याच्या आई आणि बहिणीला घरापासून लांब उभा राहून बघत असतो. परंतु तो घरात जात नाही. तिथेच रस्त्यावर तो भावूक होऊन उभा राहतो. मग ‘धुरंधर 2’च्या या क्लायमॅक्सचा नेमका अर्थ काय होतो? हमजा त्याच्या घरी परत जातो की देशसेवेसाठी पुन्हा नव्या मिशनवर जातो? आदित्य धरने तिसऱ्या भागासाठी काही कथा राखून ठेवली आहे का, असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात.
आपलं मिशन पूर्ण करून हमजा भारतात परत येऊन अजय सन्यालला भेटतो. मात्र आपल्या ऑपरेशनबद्दल अधिकाऱ्यांना अधिकृतपणे माहिती देण्यापूर्वीच तो त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पठाणकोटला जातो. पगडी घातलेला जसकीरत दुरूनच त्याच्या आईला आणि बहिणीला पाहतो. तो त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंतर त्यांना न भेटताच तो माघारी फिरतो आणि निघून जातो. या क्लायमॅक्सच्या दृश्यात आदित्य धरने हमजाच्या आयुष्यातील बदल आणि त्याच्या मिशनची भावनिक किंमत काय होती, हे अधोरेखित केलं आहे. हमजा त्याच्या कुटुंबीयांच्या अगजी जवळ येऊनसुद्धा तो त्यांना भेटू शकत नाही. शिवाय, तेसुद्धा त्याच्याशिवाय आनंदी आयुष्य जगत आहेत. त्यामुळे तो त्यांना न भेटताच निघून जाण्याचा निर्णय घेतो.
जसकीरत त्याच्या कुटुंबाला न भेटता पुढे कुठे जातो किंवा तो कोणाला भेटतो, या प्रश्नाचं उत्तर या दुसऱ्या भागात मिळत नाही. दिग्दर्शक आदित्य धरने त्याच्या मुख्य पात्राचं भविष्य अनिर्णित ठेवलं आहे. यातून त्याने ‘धुरंधर 3’बद्दल संकेत दिले आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होतो. परंतु याबद्दलची अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. आदित्यने त्याच्या या चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांनी आपापला अर्थ काढण्यासाठी खुला ठेवला आहे, असंही म्हणायला हरकत नाही. जसकीरतचं पुढे काय झालं असेल, हे ठरवण्याची जबाबदारी त्याने प्रेक्षकांवर सोडली आहे.