
गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तो चित्रपट अखेर जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दुसऱ्या भागाचाच सध्या सर्वत्र बोलबाला आहे. डिसेंबर 2025 मध्ये ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणेच या दुसऱ्या भागात भरभरून ट्विस्ट, ॲक्शन आणि दमदार कथानक पहायला मिळत आहे. हमजा आणि जसकीरत सिंह रंगी अशा दुहेरी भूमिकेत रणवीरने जबरदस्त कमबॅक केलं आहे. हा चित्रपट कोणत्या पाच कारणांसाठी पहावा, ते जाणून घेऊयात..
‘धुरंधर: द रिव्हेंज’ची कथा ही रणवीर सिंहने साकारलेल्या हमजा अली मजारीच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीची आहे. जसकिरत सिंह रंगीचा भूतकाळ नेमका काय आहे, याचा उलगडा या दुसऱ्या भागात होतो. जसजशी या चित्रपटाची कथा पुढे सरकते, तसतशी त्याची खरी ओळख प्रेक्षकांना चकीत करते. तो हमजा कसा बनला, त्याला प्रशिक्षण कसं मिळालं, त्याच्या कुटुंबीयांसोबत काय घडलं, त्याचा ‘उरी’शी काही संबंध आहे का, या प्रश्नांची उत्तरं हळूहळू या चित्रपटाच्या कथेतून उलगडत जातात. या चित्रपटाची कथा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते.
या दुसऱ्या भागात रणवीर सिंह पुन्हा एकदा हमजा अली मजारीच्या भूमिकेत परतला आहे. जे अतिशय धूर्त आणि धोकादायक पात्र आहे. एका भारतीय गुप्तहेरापासून कराचीतील ल्यारीपर्यंतचा त्याचा प्रवास जबरदस्त ॲक्शन आणि रोमांचने परिपूर्ण आहे. त्याच्या धूर्त चाली, अचानक केलेले विश्वासघात, हमजाचा प्रवास हे सर्व या भागात अधिक उत्कट बनतात. दिग्दर्शकाची मेहनत प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येते. चार तासांचा हा चित्रपट असूनही कुठेही तो रटाळवाणा वाटत नाही.
आदित्य धर त्याच्या उत्तम दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. ‘धुरंधर 2’मधील प्रत्येक तपशील, प्रत्येक क्षण त्यांनी अत्यंत अचूकपणे चित्रित केला आहे. बारकाईने कोरिओग्राफ केलेले ॲक्शन सीक्वेन्सपासून प्रत्येक फ्रेमपर्यंत कथेची रचना आणि तिचा प्रभाव कसा वाढवता येईल, याचा विचार दिग्दर्शकाने केला आहे. त्यामुळे एकंदरीत हा एक जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट ठरतो.
‘धुरंधर 2’मधील दमदार ॲक्शन सीक्वेन्स आणि संगीत उल्लेखनीय ठरतात. यामधील हिंसाचारसुद्धा पुढच्या स्तरावरचा आहे. यापूर्वी तुम्ही कोणत्याही चित्रपटात अशी हिंसा पाहिली नसेल. काही दृश्ये तर इतकी भयानक आहेत की ज्याने अंगावर अक्षरश: काटा येतो. यात संगीताचाही वापर अत्यंत सुंदरपणे केला आहे. काही क्लासिक गाणी प्रेक्षकांचं मन नक्कीच जिंकतील.
हा चित्रपट तुम्हाला एक असा अनुभव देतो जो तुम्ही दीर्घकाळ लक्षात ठेवाल. रणवीरने त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम अभिनय केला आहे. इतर कलाकारांमध्ये अर्जुन रामपाल खूपच भीतीदायक दिसतो. आर. माधवननेही त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इतक्या मोठमोठ्या कलाकारांच्या गर्दीतही अभिनेत्री सारा अर्जुनने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटातील बडे साहबचा सरप्राइजसुद्धा थक्क करणारा आहे.