Dhurandhar 2: ‘किलिंग मशीन’ हमजाचा कराचीत धुमाकूळ; ‘धुरंधर 2’ पाहून अक्षरश: अंगावर येईल काटा!
रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा चित्रपट कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी हा रिव्ह्यू नक्की वाचा. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर जगभरातील थिएटर्समध्ये हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने तीन महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप सोडली होती, की ‘धुरंधर 2’मध्ये नेमकं काय होणार, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हमजाची संपूर्ण कहाणी पाहण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. अखेर ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा दुसरा भाग थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘धुरंधर 2’ सुरू होताच तुम्ही त्या कथेत पुन्हा पोहोचता, ज्या कथेनं डिसेंबरमध्ये प्रेक्षकांना साडेतीन तीस तास खुर्चीला खिळवून ठेवलं होतं.
‘धुरंधर 2’ने सर्वांत आधी त्या लोकांची तक्रार दूर केली, जे पहिल्या भागात रणवीर सिंहच्या तगड्या धमाक्याची प्रतीक्षा करत होते, परंतु त्यांना ते फक्त चित्रपटाच्या शेवटी पहायला मिळालं होतं. आता दुसऱ्या भागाची कथा जसकीरत सिंह रंगीपासून सुरू होते. त्याच्या आयुष्यात असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे तो ‘किलिंग मशीन’ बनला, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेतल्यानंतर कथेतला सर्वांत मोठा भावच बदलून जातो. या सीक्वेन्समध्ये रणवीरची ऊर्जा पाहून लक्षात येतं की त्याने या भूमिकेसाठी किती मेहनत घेतली असेल? हिंसेसाठी लागणाऱ्या ताकदीसोबतच पडद्यावर ज्या भावना दाखवायच्या असतात, त्या प्रत्येकावर रणवीर खरा उतरतो.
जसकीरतची पार्श्वभूमी
जसकीरतची पार्श्वभूमी दाखवल्यानंतर या चित्रपटाची कथा पुन्हा ल्यारीमध्ये परतते, जिथे तो आता हमजा बनून राज्य करतोय. जमील जमाली, एसपी चौधरी, मेजक इक्बाल आणि उजैर बलोच यांच्यासोबत तो काय खेळ खेळतो, हे मध्यांतरापूर्वीच्या कथेत पहायला मिळतं. परंतु इंटरवलनंतर कथेत मोठा ट्विस्ट येतो. हमजाचं खरं रुप सर्वांसमोर आणणारी एक भूमिका मध्यांतरानंतर येते. पंजाबमधील ड्रग्जची समस्या, फुटीरतावादी चळवळींना मिळणारा निधी, नेपाळ आणि उत्तर प्रदेशमार्गे देशात येणारं बनावट चलन.. या सर्व गोष्टींमुळे ‘धुरंधर 2’चं कथानक पूर्णवेळ खिळवून ठेवतं. या सर्व घटनांबाबतच्या बातम्या तुम्ही टीव्हीवर पाहिल्या असतील किंवा वर्तमानपत्रांमध्ये वाचल्या असतील, परंतु चित्रपटात त्यांना पाकिस्तानातील वाढत्या दहशतवादाशी जोडलं गेलं आहे.
इतर घडामोडी
इंटरवलनंतर अजय सन्याल (आर. माधवन) हमजाला कराचीमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी पूर्ण मोकळीक देतो. एका माजी नेत्याला गोळ्या घालून ठार मारल्याचं दृश्य, नोटाबंदी हा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट उधळून लावणारा निर्णय होता, असे दर्शवणारे प्रसंग, अनेक वर्षांपूर्वी भारतातून गायब झालेल्या कुख्यात गुंड पाकिस्तानात दाखवला जातो, या सर्व घटना ‘धुरंधर 2’मध्ये पहायला मिळतात. या दुसऱ्या भागाचा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा अधिक लांबीचा आहे. परंतु या भागाची गती काही ठिकाणी मंदावते. असं असलं तरी आदित्य धरने कथेत पुढे काय वाढवून ठेवलं आहे, याची उत्सुकता किंचितही कमी होत नाही.
‘धुरंधर 2’मध्ये संजय दत्तने साकारलेला एस. पी. चौधरी आणखीनच खतरनाक बनला आहे. तर अर्जुन रामपालने साकारलेला मेजर इक्बाल पहिल्या भागाप्रमाणेच खलनायक बनलेला आहे. राकेश बेदींनी साकारलेला जमील जमाली हा ‘धुरंधर 2’चा खरा नायक आहे. चित्रपटाच्या अखेरीस त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट आवर्जून होतो. ‘धुरंधर 2’ या चित्रपटात पहिल्या भागाची कथा मूळ हेतूनुसारच पुढे नेण्यात आली आहे. असं करताना शैली, कथानक किंवा अॅक्शनच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. अॅक्शन, हिंसा आणि अत्याचार पहिल्या भागापेक्षा दुप्पट तीव्र आहेत. या चित्रपटाच्या शेवटी एक सीन आहे, ज्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बसून राहावं लागेल. तो सीन तुम्हाला आवडेल की नाही, हा नंतरचा प्रश्न आहे. एकंदरीत ‘धुरंधर 2’ हा अत्यंत दमदार सीक्वेल आहे. फक्त एक चित्रपट म्हणून पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा थोडा लांब वाटू शकतो.
