
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ येत्या 19 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ट्रेलरची सुरुवातच एका संतापजनक संवादाने झाली होती. चित्रपटात दहशतवादी जहूर मिस्त्री हा अजय सन्यालला म्हणतो की,
हिंदू हे भित्रे समुदाय आहे.” याच डायलॉगमुळे काहींनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. इतकंच नव्हे तर जहूर मिस्त्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला नेटकऱ्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
अभिनेता विवेक सिन्हा ‘धुरंधर 2’मध्ये दहशतवादी जहूर मिस्त्रीची भूमिका साकारत आहे. त्याच्या वादग्रस्त डायलॉगमुळे सोशल मीडियावर त्याच्याबद्दल बरंच काही लिहिलं जात असल्याचं विवेकने इन्स्टाग्रामवर म्हटलं होतं. विवेकला लोकांच्या नकारात्मक टिप्पण्यांचा सामना करावा लागत आहे. असं असलं तरी भूमिकेबद्दल आनंदी असल्याचं त्याने म्हटलंय. दिग्दर्शक आदित्य धर ट्रेलरमध्ये विवेकच्या डायलॉगचा समावेश करेल, याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विवेक या चित्रपटाविषयी आणि त्यातील त्याच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे.
“धुरंधर 2 चा ट्रेलर पाहिल्यानंतर मी थक्क झालो होतो. कारण माझ्या डायलॉगने त्याची सुरुवात होईल, याची मला कल्पनाही नव्हती. माझ्यासाठी ही अत्यंत कमालीची बाब होती. आदित्यने मला माझ्या भूमिकेविषयी आधीच सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. सेटवरील वातावरणसुद्धा उत्तम होतं, ज्यामुळे मला अभिनय करण्यास आणि त्या प्रकारची भूमिका साकारण्यास मदत झाली. माझ्या कामाबद्दल मला लोकांकडून कमालीचा फीडबॅक मिळत आहे. मला कमीत कमी तीनशे मेसेजेस आले आहेत, ते सुद्धा देशातील विविध कानाकोपऱ्यातून. सर्वजण मला त्यांच्या भाषेत व्हिडिओ बनवून पाठवत आहेत. अनेकांनी मला इंस्टाग्रामवर मेसेज केले आहेत. माझ्याविषयी जवळपास 1700 लोक विविध गोष्टी लिहित आहेत,” असं तो म्हणाला.
लोकांच्या प्रतिक्रियांविषयी बोलताना त्याने पुढे सांगितलं, “मला एका मुलीची कमेंट खूप आवडली होती. तिने लिहिलं होतं की सर मी तुम्हाला दोन-तीन शिव्या देऊ शकते का? कारण तुमची भूमिका पाहून मला खूप राग आला होता. परंतु मी तुमच्या अभिनयाची चाहती झाली आहे. याशिवाय इतरही अनेक कमेंट्स होते. एकाने लिहिलं होतं की, मी तुला पाकिस्तानात येऊन मी मारेन. अनेकांना असं वाटतंय की मी खराखुरा दहशतवादी आहे. पण माझ्यासाठी हे कौतुकापेक्षा कमी नाही. लोकांची नकारात्मकता मिळवूनही मला चांगलं वाटतंय. याचा अर्थ मी माझी भूमिका अत्यंत चोख साकारली आहे.”
विवेक सिन्हा हा उत्तर प्रदेशातील बिजनोरच्या धामपूर इथला आहे. त्याने बॉलिवूडमधील काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत. ‘दिल्ली क्राइम 3’, ‘तांडव’ यांसारख्या सीरिजमध्ये त्याने काम केलंय.