
हा प्रवास एका अशा दिग्दर्शकाचा आहे, ज्याने क्रिकेटच्या मैदानावर भारतासाठी दमदार कामगिरी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. परंतु हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळाली नसेल तर त्यापेक्षा खूप काही चांगलं आपल्यासोबत घडायचं असतं, ही ओळख या दिग्दर्शकाच्या आयुष्यासाठी तंतोतंत लागू होते. कारण क्रिकेटच्या मैदानावर जरी त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नसली तरी खऱ्या आयुष्यातील घटनांना फिल्मी फिरकी देऊन त्याने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. क्रिकेटर बनण्याचं स्वप्न भंगलं, आता आपण काय करावं, असे प्रश्न जरी त्याला त्यावेळी खूप मोठे वाटत असले तरी भविष्यात त्याच्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. अर्थातच त्या चांगल्या गोष्टी त्याच्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि हार न मानण्याच्या जोरावर कमावल्या आहेत. हा दिग्दर्शक दुसरा -तिसरा कोणी नसून ‘धुरंधर’ आदित्य धर आहे. ‘धुरंधर’ची कथा तर प्रेक्षकांना समजली आहे, परंतु ही कथा रचणाऱ्या आदित्याची खरी कहाणी काय आहे?
आदित्य धरचा जन्म 1983 मध्ये दिल्लीतल्या एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. त्याची आई दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होती. त्याच शहरात आदित्यने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथेच त्याने क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहिलं. स्पिनर म्हणून भारताची जर्सी घालून देशासाठी खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं. यासाठी त्याने बरीच तयारीसुद्धा केली होती. परंतु जेव्हा अंडर 19 वर्ल्ड कपच्या टीममध्ये तो सहभागी होऊ शकला नव्हता, तेव्हा मात्र त्याला या स्वप्नावर पाणी फेरावं लागलं होतं.
आदित्यच्या आयुष्यातील समस्या या फक्त क्रिकेटच्या मैदानापर्यंतच मर्यादित नव्हत्या. डिस्लेक्सियामुळे त्याला अभ्यासात नेहमीच समस्यांचा सामना करावा लागला होता. दीडशे पानांची स्क्रिप्ट वाचणंच त्याच्यासाठी इतकं कठीण होतं, त्यामुळे स्क्रिप्ट लिहिण्याचा तर विचारच सोडा. तरीही आदित्यने स्वप्न पाहणं आणि त्यासाठी मेहनत करणं सोडलं नव्हतं. जवळपास 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये त्याने मुंबईत पाऊल ठेवलं होतं. सुरुवातीची दहा ते बारा वर्षे त्याची संघर्षाचीच होती.
आदित्य धरने मुंबईत आल्यानंतर थेट दिग्दर्शक म्हणून काम केलं नाही. तर त्यापूर्वी तो गीतकार म्हणून आपलं कौशल्य इंडस्ट्रीसमोर आणत होता. बॉलिवूडच्या प्रसिद्ध यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनलेल्या ‘काबुल एक्स्प्रेस’साठी त्याने ‘काबुल फिजा’ हे गाणं लिहिलं होतं, जे त्यावेळी हिट ठरलं होतं. त्याचवेळी आदित्यने ‘बंदू’ या लघुपटाची कथा आणि त्याचे संवाद लिहिले. या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतरही त्याने बऱ्याच स्क्रिप्ट आणि कथांवर काम केलं, ज्यावर यशस्वी चित्रपटसुद्धा बनले. परंतु या कामाचं श्रेय आदित्यला मिळालं नाही.
2010 मध्ये आदित्यने दिग्दर्शिक प्रियदर्शनकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला. इथे त्याला कमर्शियल फिल्ममेकिंग आणि स्क्रीन राइटिंगमधील बारकावे शिकायला मिळाले. त्याने प्रियदर्शन दिग्दर्शित अजय देवगण-अक्षय खन्नाच्या ‘आक्रोश’ (2010) चित्रपटासाठी संवादसुद्धा लिहिले होते. आदित्यची भाषेवरील पकड खूप मजबूत होती आणि हीच त्याची सर्वांत मोठी ताकद असल्याचं प्रियदर्शनने म्हटलं होतं.
जवळपास तीन वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर आदित्यला स्वत:चा चित्रपट दिग्दर्शित करायचा होता. परंतु हे करणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. अनेक महिन्यांची मेहनत, संघर्ष.. त्यात काही प्रोजेक्ट्स सुरू झाले, परंतु त्यातही अडचणी येत राहिल्या. 2016 मध्ये करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत त्याला एका चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटाचं नाव होतं ‘रात बाकी’. यामध्ये कतरिना कैफ आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाच्या शूटिंगचीही तयारी झाली होती, सर्वकाही सेट होतं, परंतु त्याचवेळी अशी घटना घडली, ज्यामुळे आदित्यचं स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिलं.
18 सप्टेंबर 2016 मध्ये जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये कट्टरपंथीयांनी हल्ला केला, ज्यामध्ये 17 भारतीय जवान शहीद झाले. त्यावेळी राजकीय वातावरणही तापलं होतं आणि बॉलिवूडवर त्याचा थेट परिणाम दिसला. पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये स्थान द्यायचं नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ‘रात बाकी’मधून फवाद खानला हटवण्यात आलं आणि त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याचा विचार केला जाऊ लागला. परंतु काही महिन्यांनंतर हा चित्रपटच बंद पडला. आदित्यची अनेक वर्षांची मेहनत अपूर्णच राहिली होती.
मेहनत, जिद्द कायम ठेवली तर योग्य दिशा आवर्जून मिळते, हे आदित्यने अनुभवलं आहे. कारण ज्या उरी हल्ल्यामुळे त्याचा पहिला चित्रपट बंद पडला होता, त्याच घटनेनं आदित्य धरला भारताच्या सर्जिकल स्ट्राइकवरून चित्रपट बनवण्याची प्रेरणा दिली. याविषयी तो एका मुलाखतीत म्हणाला, “रात बाकी हा चित्रपट बंद पडल्यानंतर उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या घटनेमुळे माझ्यात एका नव्या कथेनं जन्म घेतला. या विषयावर चित्रपट बनवणं गरजेचं असल्याचं मला वाटलं. त्यासाठी मी माझी सर्व जमापूंजी पणाला लावून रिसर्च करण्यास सुरुवात केली होती. पत्रकार, सैन्यातील अधिकारी आणि संरक्षण विशेषज्ज्ञांच्या भेटी घेतल्या. अपयशाची भीती होतीच, पण त्यापेक्षा मोठी जिद्द स्वत:ला सिद्ध करण्याची होती.” जवळपास सहा महिन्यांच्या तयारीनंतर आदित्यने फक्त 12 दिवसांत ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली.
2019 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सरप्राइज ब्लॉकबस्टर बनला आणि आदित्य धर हे नाव संपूर्ण देशाला माहीत झालं. ‘हाऊज द जोश’ हा चित्रपटातील डायलॉग फक्त प्रेक्षकांपर्यंतच नाही तर निवडणुकांच्या सभांपर्यंत पोहोचला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं कौतुक झालं, परंतु काही समीक्षकांनी त्यावर प्रचारकीचा (प्रोपेगेंडा) ठपकाही ठेवला. या चित्रपटाला एकूण चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यात आदित्यने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता.
याच चित्रपटाने आदित्यला त्याच्या अनोख्या पद्धतीने चित्रपट बनवण्याचा यशस्वी फॉर्म्युला मिळाला होता. खऱ्या घटनांपासून प्रेरणा घेऊन पॉलिटिकल थ्रिलर्स बनवण्याचा हा फॉर्म्युला होता. आदित्यने ‘बी-62 स्टुडिओज’ या प्रॉडक्शन कंपनीची सुरुवात केली. लेखक म्हणून त्याने ‘आर्टिकल 370’ आणि ‘बारामुल्ला’मध्येही भारतातील दोन महत्त्वाच्या वास्तविक घटनांची झलक दाखवली. परंतु या दोन्ही चित्रपटांवरही प्रचारकी असल्याचा आरोप झाला. तरीही चित्रपटाच्या भावनात्मक बाजूचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. दिग्दर्शक म्हणून आपल्या खऱ्या रुपात परत येण्यासाठी आदित्यने पुढे जो विषय निवडला, तो अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. पाकिस्तानमधील गँगवॉर, राजकारण, दहशतवाद आणि भारताचा एक गुप्तहेर.
‘धुरंधर’चा हिरो म्हणून आदित्यने अभिनेता रणवीर सिंहची निवड केली. त्यावेळी 83, जयेश भाई जोरदार आणि सर्कस यांसारखे त्याचे चित्रपट लागोपाठ फ्लॉप ठरले होते. ‘धुरंधर’ हा आधी एकच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता. परंतु रिसर्च आणि कथेचा आवाका पाहून त्याचं दोन भागांत विभाजन करण्यात आलं. ‘धुरंधर’ने जगभरात 1300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली, तर आता ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दुसऱ्या भागाने अवघ्या 7 दिवसांत जगभरात 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत आणि दिग्गज कलाकारांनाही कौतुक करण्यास भाग पाडलं आहे.
प्रचंड यश मिळूनही ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटांवर प्रोपेगेंडाचा आरोप झाला. याबाबत सोशल मीडियावर बरीच मतमतांतरे पहायला मिळत आहेत. खरंतर गुप्तहेराच्या कथांमध्ये नेहमीच राष्ट्रवाद, सुरक्षा आणि सीमापार तणाव यांसारख्या प्रमुख समस्या अनेकदा हाताळल्या जातात. कारण त्यानेच कथेला खरा रंग येतो. चित्रपट हे फक्त मनोरंजन नसून ते त्या काळातील कथा आण लोकांच्या विचारांचेही प्रतिबिंब असतात. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे आणि त्याविरुद्ध ‘प्रोपेगेंडा’ असा वाद सुरूच राहील. हे वादविवाद आणि चर्चा होणंही तितकंच गरजेचं आहे. त्यातूनच हे दिसून येतं की देशातील लोकांनी विचार करणं, प्रश्न विचारणं आणि स्वत:ची मतं बनवणं थांबवलेलं नाही.
चित्रपट समीक्षक मयंक शेखर याविषयी म्हणतात, “चित्रपटाच्या संदर्भात प्रोपेगेंडा हा शब्द मी नकारात्मक किंवा अपमानास्पद मानत नाही. पण तो उघडपणे आक्षेपार्ह नसावा, जसं ‘द केरळ स्टोरी’च्या बाबतीत होतं. धुरंधरमध्ये 2016 च्या नोटबंदीनंतरच्या राजकारणाचे काही संदर्भ आहेत. पण सरतेशेवटी ही कथा पूर्णपणे द्वेषावर अवलंबून नाही. हमजा त्यात स्पष्टपणे सांगतो की त्याला दहशतवाद्यांशी अडचण आहे, पाकिस्तानींशी नाही.”
प्रोपेगेंडाच्या या आरोपांवर खुद्द आदित्य धरनेही एका पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली होती. “जे याला प्रचार असं म्हणत आहेत, मला त्यांची पर्वा नाही. खरं सांगायचं तर, अजिबात त्याची चिंता नाही. कारण हे सर्व कुठून येतंय हे मला माहीत आहे आणि भारतीय प्रेक्षक खूप हुशार आहे. ते जेव्हा चित्रपट पाहतात, तेव्हा त्यांना सहज समजतं की कोणता प्रचारकी आहे आणि कोणत्या चित्रपटाची नियत साफ आहे. माझ्या चित्रपटाचा निर्माता किंवा दिग्दर्शक जोपर्यंत मी असेन, तोपर्यंत त्याचा हेतू नेहमीच योग्य असेल. ज्यादिवशी माझा हेतू योग्य नसेल, त्यादिवशी मी चित्रपट बनवणं सोडून देईन”, असं त्याने छातीठोकपणे म्हटलं होतं.
मोठ्या यशासोबतच खांद्यावर जबाबदारीही मोठी असते. वास्तव आणि काल्पनिक गोष्टी यांच्यातील सूक्ष्म रेषेचा आदर आपला कॅमेरा करेल, हे सुनिश्चित करण्याची मोठी जबाबदारी आदित्यच्या खांद्यावर यापुढेही असेल.