हे गाणं ऐकताच आंदोलकांमध्ये येतो जोश, 69 वर्षांपासून लोकप्रिय, प्रत्येक लढ्यात ऐकायला मिळते
69 वर्षांपूर्वीचं दिलीप कुमार यांचं गाणं, जे आजही प्रत्येक आंदोलनाची वाढवते शान, मोहम्मद रफी यांचा आवाज ऐकताच आंदोलकांमध्ये येतो जोश. तुम्ही ऐकलं तरी म्हणाल....

हिंदी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शेकडो गाणी प्रदर्शित होतात. त्यापैकी अनेक गाणी काही काळ लोकप्रिय ठरतात आणि नंतर काळाच्या ओघात लोक ती गाणी विसरून जातात. मात्र काही गाणी अशी असतात, जी केवळ चित्रपटापुरती मर्यादित राहत नाहीत तर समाजाच्या भावविश्वाचा आणि जनजीवनाचा अविभाज्य भाग बनतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटातील ‘साथी हाथ बढ़ाना…’ हे गाणे अशाच अजरामर गाण्यांपैकी एक मानले जाते.
सुमारे 69 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गीताची लोकप्रियता आजही कायम आहे. विविध आंदोलने, सामाजिक मोहिमा, जनजागृती अभियान किंवा अन्यायाविरोधातील लढ्यांमध्ये हे गाणं लोकांमध्ये एकजूट, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणा देताना ऐकायला मिळते. एकत्र येऊन संकटांचा सामना करण्याचा संदेश देणारे हे गाणं आजही तितकेच लोकप्रिय आहे.
चित्रपटातील प्रसंग, पण संदेश काळाच्या पलीकडचा
1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नया दौर’ या चित्रपटात हे गाणे एका अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी दाखवण्यात आले आहे. गावातील लोक आपल्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी एकत्र येऊन रस्ता बांधण्याचे काम करत असतात. त्या संघर्षमय प्रसंगात हे गाणं त्यांच्या एकजुटीचे आणि सामूहिक श्रमाचे प्रतीक बनते.
मात्र या गाण्याचा आशय केवळ चित्रपटातील कथानकापुरता मर्यादित राहत नाही. ‘एकत्र या, एकमेकांचा हात धरा आणि हार मानू नका,’ हा सार्वकालिक संदेश या गाण्यातून दिला गेला आहे. त्यामुळेच काळ बदलला, परिस्थिती बदलली, पिढ्या बदलल्या तरी या गाण्याचे महत्त्व कमी झालेले नाही.
आंदोलनांपासून सामाजिक मोहिमांपर्यंत कायमची साथ
विद्यार्थी आंदोलने, कामगारांचे मोर्चे, सामाजिक न्यायासाठीचे लढे, जनजागृती मोहिमा किंवा लोकहिताच्या विविध चळवळींमध्ये ‘साथी हाथ बढ़ाना…’ हे गाणं आजही उत्साहाने गायले जाते. एकी, संघर्ष आणि आशावादाचा संदेश देणारे हे गाणे प्रत्येक काळात आणि प्रत्येक पिढीने स्वीकारले आहे.
या अजरामर गाण्याला स्वरसम्राट मोहम्मद रफी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या मधुर आवाजाने अमर केले. गाण्याचे बोल प्रख्यात गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिले, तर त्याला संस्मरणीय संगीत दिग्दर्शक ओ. पी. नैय्यर यांनी संगीतबद्ध केले.