‘सगळं संपलं’, वाईट काळात गोविंदाने केला होता जीवन संपविण्याचा विचार? नेमकं काय घडलेलं?

आता सर्व संपलं, म्हणत बॉलिवूड अभिनेता गोविंदाने केला होता जीवन संपविण्याचा विचार. एका पुजाऱ्यामुळे मिळाले नवजीवन. नेमकं काय घडलेलं?

‘सगळं संपलं’, वाईट काळात गोविंदाने केला होता जीवन संपविण्याचा विचार? नेमकं काय घडलेलं?
| Updated on: Aug 09, 2026 | 7:06 PM

बॉलिवूड अभिनेता गोविंदाने आपल्या आईच्या निधनानंतर आलेल्या अत्यंत कठीण काळाबद्दल नुकताच खुलासा केला आहे. आई निर्मला देवी यांच्या निधनानंतर आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेलो होतो आणि त्या काळात आत्महत्येचे विचारही मनात आल्याचे त्याने सांगितले. एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलताना गोविंदाने त्याच्या आयुष्यातील हा भावनिक प्रसंग सांगितला.

गोविंदाची आई निर्मला देवी यांचे 15 जून 1996 रोजी वयाच्या 69व्या वर्षी निधन झाले. आईशी त्याचे अतिशय घट्ट नाते होते. त्यांच्या निधनानंतर गोविंदाला मोठा मानसिक धक्का बसला होता. आईच्या मृत्यूनंतर आपण इतके दुःखी झालो होतो की, ‘सगळं संपलं आहे’, अशी भावना मनात निर्माण झाली होती, असे त्याने सांगितले.

आईला पुन्हा भेटण्यासाठी नर्मदा नदीत पुढे गेले

गोविंदाने त्या काळातील एक धक्कादायक प्रसंग आठवला. आईच्या निधनानंतर तो नर्मदा नदीजवळ गेला होता. आईला पुन्हा भेटता येईल, या भावनेतून तो नदीच्या पाण्यात पुढे जाऊ लागला होता. त्या वेळी त्याच्या मनात आत्महत्येचा विचार काही प्रमाणात आला होता अशी कबुली त्याने दिली.

गोविंदा म्हणाला की, तो आपल्या आईशी खूप भावनिकरित्या जोडलेला होता आणि त्यांच्यावर त्याचे खूप प्रेम होते. मात्र, त्या घटनेकडे आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न म्हणून पाहत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.

पुजाऱ्याने नदीतून काढले बाहेर

नर्मदा नदीतील हा प्रसंग पुढे त्याच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरला. राम कुंडल नावाच्या एका पुजाऱ्याने गोविंदाला नदीत पाहिले आणि त्याला आवाज दिला. त्यानंतर पुजारी त्याच्याजवळ गेले आणि त्याला नदीतून बाहेर काढले. या घटनेनंतर गोविंदाला आपण जे करत होतो ते चुकीचे असल्याची जाणीव झाली. त्याला आपल्या मुलांसाठी जगण्याचा नवा उद्देश मिळाला. ‘मला माझ्या मुलांसाठी जगायचं आहे,’ असा विचार त्याच्या मनात दृढ झाला.

15 दिवसांपेक्षा जास्त काळ लागला सावरण्यास

या मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी गोविंदाला 15 दिवसांपेक्षा जास्त काळ लागला. या अनुभवाने त्याच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. चित्रपट, अभिनय आणि स्टारडम याच्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी या घटनेनंतर वेगळी झाल्याचे त्याने सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us