CM Vijay : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शंका घेणाऱ्या अभिनेत्याला विजय यांच्या मंत्र्यांने खूप सुंदर उत्तर दिलं
CM Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी नुकतचं त्यांचं मंत्रिमंडळ जाहीर केलं. त्यातील चित्रपट मंत्र्याच्या निवडीवर प्रसिद्ध अभिनेत्याने शंका घेतली होती. ज्यांच्या क्षमतेवर शंका घेतली, त्याच मंत्र्याने या अभिनेत्याला सुंदर उत्तर दिलं.

तामिळनाडूचे चित्रपट तंत्रज्ञान आणि सिनेमॅटोग्राफ कायदा मंत्री राजमोहन अरुमुगम शुक्रवारी रोमिओ पिक्चर्सच्या पुढच्या चित्रपटाच्या लॉन्चसाठी उपस्थित होते. त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा शेवटचा चित्रपट ‘जन नायगन’ चित्रपटाचं स्टेटस काय आहे, त्याची माहिती दिली. विशालने केलेल्या टीकेवर सुद्धा ते बोलले. राजमोहन अरुमुगम यांना चित्रपट मंत्री करण्याच्या विजय यांच्या निर्णयावर अभिनेते विशाल यांनी टीका केली होती. विजय यांनी या महिन्याच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाची घोषणा केली. त्यावेळी विशालने एक्सवरुन चित्रपट मंत्री म्हणून राजमोहन यांच्या निवडीवर टीका केली होती.
राजमोहन अरुमुगम यांना जेव्हा विशालच्या टीकेबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा यांनी शांतपणे उत्तर दिलं. “मी माझं कर्तव्य निभावत राहीन. विशालसाठी सुद्धा काम करेन. मला कॅबिनेट मंत्री केल म्हणून त्याने आमच्या पक्षावर टीका केली होती. मी माझ्या कामाने विशालचा विश्वास संपादन करीन आणि माझ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा अभिमान वाटेल असं काम करेन” ‘विशाल मला ओळखत नाही. पण मी त्याचे चित्रपट पाहतो. अभिनेता म्हणून मला तो आवडतो’ असं राजमोहन म्हणाले.
चित्रपट उद्योग सध्या रक्तबंबाळ अवस्थेत
“सन्मानीय आमदारांना मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मंत्रालयांचं खातेवाटप केलं ते पाहून आनंद झाला. पण चित्रपट मंत्रालय राजमोहन यांना दिल्यामुळे निराशा झाली. चित्रपट उद्योग सध्या रक्तबंबाळ अवस्थेत आहे. अनेक सुधारणांची गरज आहे. निर्माते/प्रोडक्शन हाऊसना आशेचा किरण दाखवण्याची गरज आहे. अशावेळी मी किंवा आमच्या संघटनेने ज्या माणसाकडे अनुभव नाही, त्यांच्यासमोर आमच्या विनंती किंवा तक्रारी कशा मांडायच्या? उलट मुख्यमंत्र्यांकडे जास्त अनुभव आहे. ते मागच्या 30 वर्षांपासून या सिनेसृष्टीचा भाग आहेत” असं विशाल यांनी राजमोहन यांच्यावर टीका करताना एक्सवर लिहिलं होतं.
विजय यांचा शेवटचा चित्रपट कधी रिलीज होणार?
मुख्यमंत्री विजय यांच्या शेवटच्या’जन नायगन’ चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी राजमोहन यांनी माहिती दिली. “सीबीएफसीने अजून प्रमाणपत्र दिलेलं नाही. सेन्सॉरकडून सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. सेन्सॉरकडून सर्टिफिकेट मिळताच आम्ही हा चित्रपट रिलीज करु. त्या संदर्भातील काम सुरु आहे” असं राजमोहन म्हणाले. “हा फक्त ‘जन नायगन’चित्रपटाचा विषय नाही. राजकीय कारणासाठी आम्ही कुठल्याही चित्रपटासोबत असं करणार नाही. सर्व प्रमाणपत्र कायदेशीररित्या मिळवल्यानंतरच चित्रपट रिलीज होईल. त्यासाठी काम सुरु आहे” असं राजमोहन म्हणाले.