हेलिकॉप्टरमध्ये हिरोसारखी एण्ट्री अन् अचानक स्फोट..; मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना दिला धक्का!
'इन्स्पेक्टर मंजू' या मालिकेत आतापर्यंतचा सर्वांत मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हेलिकॉप्टरचा हा सीन शूट करण्यासाठी टीम साताऱ्याहून पुण्याला गेली होती.

‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकमेकांमधील गैरसमज दूर करून सत्या आणि मंजू पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांना वेगळं करण्यासाठी आर्यन प्रत्येक वेळी नवा डाव आखतो. मात्र, सत्या–मंजूमधील विश्वास आणि प्रेम नेहमीच जिंकताना दिसतं. सध्या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला प्रोमो पाहून सत्या आणि मंजूमध्ये पुन्हा दुरावा येणार का, हा प्रश्न नव्याने उपस्थित झाला आहे. ‘इन्स्पेक्टर मंजू’च्या या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मालिकेत मोठा ट्विस्ट
मम्मीसाहेब आजारी असल्यामुळे सत्या पक्षाच्या कामासाठी दिल्लीला जाण्यास निघतो. मंजू त्याला जाण्यास नकार देते, पण पक्षाकडून बोलावणं आल्यामुळे जावंच लागेल असं सांगत सत्या निघतो. पुढे या प्रोमोमध्ये हेलिकॉप्टरचा स्फोट झाल्याचं दिसून येतं. हा अपघात आहे की कुणाचा कट? सत्या सुरक्षित आहे का? की सत्या-मंजूवर पुन्हा संकटाचं सावट? असे विविध प्रश्न प्रेक्षकांनी हा थरारक प्रोमो पाहिल्यानंतर उपस्थित केले आहेत. “सत्या–मंजू कधीही वेगळे होऊ शकत नाहीत.” अशा प्रतिक्रियाही काहींनी दिल्या आहेत. आता या भागात नेमकं काय घडणार, हे 2 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता ‘सन मराठी’वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्याची प्रतिक्रिया
या प्रोमोबद्दल सत्या म्हणजेच अभिनेता वैभव कदम म्हणाला, “नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांचे खूप मेसेज येत आहेत. खरंच तुझा अपघात होणार आहे का? आणि मंजूच्या आयुष्यातून सत्याची एक्सिट होणार आहे का ? अश्याप्रकारचे बरेच प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत. आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. हेलिकॉप्टरचा हा सीन शूट करण्यासाठी आमची टीम साताऱ्याहून पुण्याला गेलेली. एक तासात आम्ही हा सीन शूट केला आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये हिरोला हेलिकॉप्टरमधून एण्ट्री करताना मी पाहिलंय. माझ्या आयुष्यातही असा क्षण येईल मी हा विचार केला नव्हता. तो क्षण मी जगलो याचा मला खूप आनंद आहे.”