Elvish Yadav | ‘बिग बॉस ओटीटी 2’ जिंकल्यानंतर एल्विश करणार भाजपमध्ये प्रवेश? युट्यूबरने सोडलं मौन

रविवारी मुख्यमंत्री खट्टर यांनी गुरुग्राममधील एल्विशच्या सत्कार कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. त्यामुळे एकदंर या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर एल्विशच्या राजकीय पदार्पणाच्या चर्चा वेगाने पसरू लागल्या. त्यावर आता त्याने मौन सोडलं आहे.

Elvish Yadav | बिग बॉस ओटीटी 2 जिंकल्यानंतर एल्विश करणार भाजपमध्ये प्रवेश? युट्यूबरने सोडलं मौन
Elvish Yadav
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 21, 2023 | 12:18 PM

हरयाणा | 21 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने ‘बिग बॉस ओटीटी 2’चं विजेतेपद जिंकत इतिहास रचला. एल्विश हा वाइल्ड कार्डद्वारे दाखल होत शो जिंकणारा पहिला स्पर्धक ठरला. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याच्यासाठी विविध ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाला त्याचे चाहते लाखोंच्या संख्येनं गर्दी करत आहेत. यादरम्यान एल्विश राजकारणात पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. गेल्या आठवड्यात त्याला हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एल्विशसोबतचा फोटोसुद्धा ट्विटरवर शेअर केला होता. या भेटीगाठीनंतर एल्विश भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

रविवारी मुख्यमंत्री खट्टर यांनी गुरुग्राममधील एल्विशच्या सत्कार कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. त्यामुळे एकदंर या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर एल्विशच्या राजकीय पदार्पणाच्या चर्चा वेगाने पसरू लागल्या. त्यावर आता त्याने मौन सोडलं आहे. ‘मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भेटणं ही एक विशेष अनुभूती होती. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. माझ्या भविष्याबाबत मी अद्याप काहीच ठरवलं नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी माझी भेट घेतली होती’, असं त्याने स्पष्ट केलं.

वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेणारा एल्विश जवळपास 50 दिवसांपेक्षा अधिक काळ तिथे टिकून राहिला. याआधी वाइल्ड कार्डद्वारे आलेला कोणताच स्पर्धक विजेता ठरला नव्हता. एल्विशने प्रसिद्ध युट्यूबर अभिषेक मल्हान, अभिनेत्री पूजा भट्ट, मनीषा राणी, बेबिका धुर्वे यांना हरवलं. बिग बॉसची ट्रॉफी आणि 25 लाखांचं रोख बक्षीस त्याने आपल्या नावे केलं. विजेतेपद जिंकल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत एल्विश म्हणाला, “ही भावना अभूतपूर्व आहे. मी नेहमी विचार केला होता की वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश करणारे स्पर्धक शो जिंकत नाहीत. परंतु मी त्या प्रत्येकाला चुकीचं सिद्ध केलं आहे. मला अजूनही हा विजय स्वप्नासारखा वाटक आहे.”

एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान या दोघांमध्ये ‘कांटे की कट्टर’ होती. त्यांना मिळालेल्या मतांमध्ये फार कमी फरक होता. एल्विश यादवला फिनालेमध्ये 54 टक्के मतं मिळाली तर अभिषेकला 46 टक्के मतं मिळाली होती. म्हणजेच फक्त आठ टक्क्यांच्या फरकाने एल्विश हा शो जिंकला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी तगडी स्पर्धा पहायला मिळाली. जिथे मतांमध्ये फक्त आठ टक्क्यांचा फरक होता.

Follow Us