विजय थलपतीचा शेवटचा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, कथा ठरतेय सुपरहिट, आतापर्यंत किती कमाई?
थलपती विजय यांचा शेवटचा चित्रपट टजन नायकन' पाहण्यासाठी थिएटरबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी. कसा आहे हा चित्रपट? जाणून घ्या आतापर्यंतची कमाई?

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय यांचा बहुचर्चित चित्रपट ‘जन नायकन’ अखेर 23 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. जानेवारी 2026 पासून अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. दिग्दर्शक एच. विनोथ यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात थलपती विजय यांच्यासोबत बॉबी देओल, पूजा हेगडे, प्रकाश राज आणि ममता बैजू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाला विशेष महत्त्व यासाठीही आहे की, अभिनय क्षेत्रातील थलपती विजय यांचा हा अखेरचा चित्रपट मानला जात आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी पहिल्या शोसाठी चाहत्यांनी थिएटरबाहेर मोठा जल्लोष केला.
दमदार सुरुवात आणि विजयची भव्य एंट्री
चित्रपटाची सुरुवातच थलपती विजय यांच्या दमदार एन्ट्रीने होते. तुरुंगातील जवळपास दहा मिनिटांचा अॅक्शन सीन हा चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरतो आहे. त्याचप्रमाणे बॉबी देओलची खलनायकाच्या भूमिकेतील प्रभावी एंट्रीही लक्षवेधी आहे.
चित्रपटाच्या पहिल्या 25 मिनिटांत सलग अॅक्शन सीन्स पाहायला मिळतात. त्यामुळे हा पूर्णपणे मसालापट असल्याची जाणीव सुरुवातीलाच होते. विजय यांच्या डान्स आणि त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स चाहत्यांना विशेष आवडतो आहे.
चित्रपटाची कथा काय?
कथा विजय यांच्या तुरुंगातून सुटण्यापासून पुढे सरकते. ज्या तुरुंगात ते शिक्षा भोगत असतात, त्या तुरुंगाच्या जेलरची हत्या होते. त्यानंतर विजय त्या जेलरच्या मुलीला दत्तक घेतात आणि तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारतात.
दुसरीकडे भारतीय नौदलावर मोठा दहशतवादी हल्ला घडतो, ज्यामागे बॉबी देओलचे पात्र असल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात एका टेडी बेअरभोवती फिरणारे रहस्यही आहे, जे कथेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करते.
विजयच्या चाहत्यांसाठी खास चित्रपट
‘जन नायकन’ हा संपूर्ण चित्रपट विजय यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती फिरतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा अॅक्शन, डान्स, भावनिक अभिनय आणि स्टारडम अधोरेखित करण्यात आले आहे.
प्रकाश राज यांनी भ्रष्ट राजकारण्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटात जनआंदोलन, भ्रष्टाचार, बनावट दारूमुळे होणारे मृत्यू, दहशतवादी हल्ले, पाकिस्तानचा संदर्भ, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विरुद्ध मानव संघर्ष, रोबोट आर्मी, ड्रोन युद्ध आणि निवडणुकांसारखे अनेक विषय एकत्र मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत या चित्रपटाने 14 कोटी रुपयांची कमाई केली आहे.