तो बळीचा बकरा बनतो..; सावत्र भाऊ अर्जुन कपूरबद्दल जान्हवी स्पष्टच म्हणाली

अभिनेत्री जान्हवी कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. जान्हवीचा सावत्र भाऊ आणि अभिनेता अर्जुन कपूरला सतत ट्रोल केलं जातं. त्यावरही तिने आपलं मत मांडलं आहे.

तो बळीचा बकरा बनतो..; सावत्र भाऊ अर्जुन कपूरबद्दल जान्हवी स्पष्टच म्हणाली
Janhvi Kapoor and Arjun Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2026 | 8:21 AM

सोशल मीडियावर कधी कोण कोणत्या कारणासाठी ट्रोल होईल, याचा आजकाल काही नेम नाही. यामध्ये सेलिब्रिटींना सर्वाधिक लक्ष्य केलं जातं. बॉलिवूड, मराठी किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असो.. कलाविश्वात असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी काहीही केलं, काहीही म्हटलं तरी ते कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. असंच एक नाव म्हणजे अर्जुन कपूर. अर्जुन कपूरला अनेकदा त्याच्या फ्लॉप करिअरमुळे आणि खासगी आयुष्यामुळे ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावर त्याच्या नावाने असंख्य मीम्स आणि मीम पेजेस पहायला मिळतात. आता अर्जुन कपूरची सावत्र बहीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने अशा ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला उगाच बळीचा बकरा बनवला जातो, असं ती म्हणाली आहे.

‘ग्रेझिया’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, “मी जितकं सोशल मीडिया कल्चरला (संस्कृती अथवा ट्रेंड) समजून घेतलं, त्यानुसार मला असं वाटतं की प्रत्येकाला व्ह्यूज हवे असतात, व्हायरल व्हायचं असतं, स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. त्यामुळे जर ते तुमच्याबद्दल कंटेंट बनवत असतील तर तुम्ही फक्त बळीचा बकरा आहात. ते तुमच्या नावाचा वापर क्लिकबेट आणि अशा गोष्टींसाठी करत आहेत, ज्याने त्यांना फक्त एंगेजमेंट मिळेल. पण जेव्हा तुम्हाला चुकीचं समजलं जातं आणि हे सर्व शोषण, बुलिंग अशा गोष्टींमध्ये बदलतं, तेव्हा वाईट वाटतं, दु:ख होतं. हे सर्व मी माझ्या भावासोबत घडताना पाहिलं आहे. अशा पद्धतीच्या वागणुकीसाठी कोणतंही निमित्त नसतं. नकारात्मकता फक्त नकारात्मकतेला वाढवते आणि तुम्हाला स्वत:ला त्यापासून दूर राहावं लागतं.”

गेल्या काही काळापासून अर्जुन कपूरच्या सोशल मीडियावर सातत्याने नकारात्मक कमेंट्स पहायला मिळत होते. त्याला बरंच ट्रोल केलं जात होतं. गेल्या महिन्यात आईच्या जन्मदिनानिमित्त अर्जुनने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. गेल्या काही काळापासून आयुष्य फार निर्दयी असल्याचं त्याने त्यात म्हटलं होतं. यानंतर अर्जुनच्या सोशल मीडियावर नकारात्मक कमेंट्स काही प्रमाणात कमी झाले. सतत फ्लॉप होणारे चित्रपट, मलायकासोबतचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप या सर्व कारणांमुळे अर्जुनला सतत ट्रोल केलं जात होतं.

Follow Us