“असं वाटतंय नाल्यात राहतोय”; जुही चावलाच्या तक्रारीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

| Updated on: Oct 30, 2022 | 1:22 PM

तुम्हालाही जाणवतेय का अशी समस्या? जुही चावलासोबत व्यक्त झाले दक्षिण मुंबईकर

असं वाटतंय नाल्यात राहतोय; जुही चावलाच्या तक्रारीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Juhi Chawla
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई- अभिनेत्री जुही चावला आणि दक्षिण मुंबईतील अनेक रहिवाशांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली आहे. जुहीने यासंदर्भात शनिवारी ट्विट करत आवाज उठवला. तुम्हालाही तुमच्या परिसरात हवेत दुर्गंधी येत आहे का, असा प्रश्न तिने या ट्विटमधून विचारला. ‘असं वाटतंय आम्ही गटारात राहतोय’, अशा शब्दांत तिने तक्रार केली आहे.

जुही चावलाचं ट्विट-

‘कोणी या गोष्टीचं निरीक्षण केलंय का, की मुंबईतल्या हवेतून दुर्गंधी येत आहे? आधी खाडीजवळून जाताना असा दुर्गंध यायचा. आता दक्षिण मुंबईतील बऱ्याच भागात अशी दुर्गंधी येतेय. एका विचित्र रासायनिक प्रदूषित हवेचाही वास पसरत आहे. दिवस आणि रात्री ही दुर्गंधी येतेय. आम्ही गटारात राहतोय की काय, असं वाटू लागलंय’, असं ट्विट जुहीने केलं आहे.

हे सुद्धा वाचा

जुहीच्या या ट्विटवर अनेकांनी त्यांनासुद्धा अशीच समस्या जाणवत असल्याची तक्रार केली आहे. ‘खरंय, ही दुर्गंधी इतकी पसरली आहे की काही मिनिटांपर्यंत ती कारमधून जात नाही. अशा परिस्थितीत लोक कसे राहत आहेत काय माहीत’, असं एकाने लिहिलं. तर ‘पहाटे मुलुंड पूर्व भागातून प्रवास केला तर ही दुर्गंधी अधिकच वाईट होऊ लागते’, अशी तक्रार दुसऱ्या युजरने केली.

जुहीने अनेकदा निसर्गाविषयी आणि प्रदूषणाविषयी भाष्य केलं आहे. कुटुंबीय आणि मित्रांचा वाढदिवस ती वृक्षारोपण करून साजरा करते. जूनमध्ये तिने 5G तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि अधिकाऱ्यांना ते सुरक्षित असल्याचं प्रमाणित करण्याची मागणी केली होती. “आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की ते लहान मुलांसाठी, गर्भवती महिलांसाठी, वृद्धांसाठी, जीवजंतूंसाठी आणि वृक्षांसाठी सुरक्षित आहे की नाही”, असा प्रश्न तिने उपस्थित केला होता.

जुहीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने नुकतंच ‘हश हश’ या वेब शोमधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. यामध्ये तिच्यासोबत सोहा अली खान, क्रितिका काम्रा, करिश्मा तन्ना आणि शहाना गोस्वामी यांनी भूमिका साकारल्या आहेत. जुहीने व्यावसायिक जय मेहताशी लग्न केलं आहे. या दोघांना दोन मुलं आहेत. तिची मुलगी जान्हवी हिने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासोबत आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.