बॉलिवूड इंडस्ट्री पुन्हा एकदा बदनाम! ‘सिंघम’ फेम अभिनेत्रीच्या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष

| Updated on: Mar 31, 2023 | 3:25 PM

बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट असा वाद आधीपासूनच सुरू असताना आता काजलच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. याआधीही बॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं कौतुक केलं होतं.

बॉलिवूड इंडस्ट्री पुन्हा एकदा बदनाम! सिंघम फेम अभिनेत्रीच्या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष
बॉलिवूडविषयी काजल अग्रवालचं वक्तव्य
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली. या चित्रपटांना केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळाली. तर दुसरीकडे एकानंतर एक बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरू लागले. बॉलिवूडविरुद्ध साऊथ फिल्म्स असा वाद आधीच सोशल मीडियावर सुरू आहे. यादरम्यान ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालने हिंदी फिल्म इंडस्ट्रीविषयी लक्ष वेधून घेणारं वक्तव्य केलं आहे. काजल ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती हिंदी आणि दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधील फरकाविषयी व्यक्त झाली.

बॉलिवूड विरुद्ध साऊथ फिल्म इंडस्ट्री

“हिंदी या भाषेला संपूर्ण राष्ट्रात मान्यता प्राप्त झाल्याने अनेकांना हिंदी फिल्म इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात करायची असते. मात्र दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री ही कलाकारांसाठी अनुकूल आहे”, असं काजल म्हणाली. साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं कौतुक करत ती पुढे म्हणाली, “दक्षिणेत सर्वोत्तम तंत्रज्ञ आहेत, उत्तम दिग्दर्शक-निर्माते आहेत आणि तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड अशा चारही भाषांमध्ये चांगला कंटेट तुम्हाला पहायला मिळतो. आपण हिंदी चित्रपट पाहतच लहानाचे मोठे झालो, हे मी मान्य करते. पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील इको-सिस्टिम, नैतिकता, मूल्ये, शिस्त, कामाची पद्धत मला अधिक आवडते. या सर्वांची कमतरता मला हिंदी सिनेसृष्टीत आढळते.”

नसीरुद्दीन शाह यांनीही केलं होतं कौतुक

बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट असा वाद आधीपासूनच सुरू असताना आता काजलच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. याआधीही बॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं कौतुक केलं होतं. “तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू चित्रपट हे त्यांच्या कल्पकतेवर काम करतात. त्यात लॉजिकचा अभाव असला तरी किमान त्यांची कथा आणि त्यातील कल्पना ओरिजिनल असतात. त्या कल्पना मोठ्या पडद्यावर मांडण्याची त्यांची शैली उत्तम असते. माझ्या मते साऊथ इंडियन चित्रपट खूप जास्त मेहनत घेतात. त्यामुळे हिंदी चित्रपटांपेक्षा त्यांना चांगलं यश मिळतंय”, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही काळात केजीएफ, पुष्पा: द राईज, कांतारा, RRR यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आणि आमिर खान यांसारख्या सुपरस्टार्सचेही चित्रपट फ्लॉप ठरले.