
गोवा सरकारद्वारे आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी रणवीरविरोधात खटला दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी नुकतीच पार पडली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने रणवीरला चांगलंच फटकारलं आहे. एक अभिनेता म्हणून तू अनेकांवर तुझा प्रभाव पाडतोस, त्यामुळे तू जबाबदारीनेच वागलं पाहिजेस, अशा शब्दांत कोर्टाने रणवीरला सुनावलं आहे. ‘इफ्फी’च्या मंचावर रणवीरने चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली आणि या ट्रोलिंगनंतर रणवीरने जाहीर माफीसुद्धा मागितली होती.
सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले, “ऋषभ शेट्टीने साकारलेल्या चावुंडी देवीची नक्कल केल्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील. तुम्ही तुमच्या विधानांमध्ये जबाबदार असलं पाहिजे. तुम्ही अजिबात कुठलाही विचार न करता बोलू शकत नाही. तुम्ही रणवीर सिंह असाल किंवा इतर कोणीही.. त्यामागे तुमचा हेतू काय होता, त्याचा आम्ही तपास करू. तुम्ही प्रसिद्ध अभिनेता असल्याने अनेक लोकांवर तुमचा प्रभाव असतो. जेव्हा तुम्ही स्टार असता तेव्हा तुम्ही जबाबदारीने वागलं पाहिजे. तुम्ही एखाद्याची नक्कल करू शकता किंवा इतर काहीही करू शकता, पण तुम्हाला कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नाही. तुम्ही माफी मागितल्याने तुमचे शब्द मागे घेतले जातील का? मी विसरेन, तुम्ही विसराल पण इंटरनेट कधीही विसरत नाही.”
“जेव्हा कलाकार मंचावर जातो, तेव्हा हे सर्व करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काळजीपूर्वक वागलं पाहिजे. त्या भागातील लोकांच्या धार्मिक भावनांचा तुम्ही आदर केला पाहिजे. तुम्ही एका देवतेबद्दल बोलत आहात, एका देवतेची नक्कल करत आहात. चित्रपट का बनवला गेला, याचं स्पष्टीकरण आहे. पण स्टेजवर उभं राहून तुम्ही ते इतकं हलक्यात घेऊ शकत नाही. तुम्ही बेपर्वाईने वागला आहात आणि तुम्ही जे केलं ते करण्याचा तुम्हाला अधिकार नाही”, अशा शब्दांत न्यायालयाने रणवीरला सुनावलं आहे. यावेळी रणवीरच्या बाजूने त्याचे वकील सातत्याने दिलगिरी व्यक्त करत होते. अखेर कर्नाटक उच्च न्यायालयाने रणवीर सिंहला याप्रकरणात अंतरिम दिलासा दिला आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 2 मार्च 2026 रोजी आदेश लागू होतील.
‘कांतारा या चित्रपटातील ऋषभच्या अभूतपूर्व परफॉर्मन्सला अधोरेखित करण्याचा माझा हेतू होता. ऋषभने तो ठराविक सीन ज्या जबरदस्त पद्धतीने सादर केला, त्यासाठी किती मेहनत करावी लागते हे मला माहित आहे. त्यासाठी मी त्याचं खूप कौतुक करतो. आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि विश्वासाचं मी नेहमीच मनापासून आदर करतो. माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’, अशा शब्दांत रणवीरने दिलगिरी व्यक्त केली होती.