Asha Bhosle Passes Away : 12 हजारांहून अधिक गाणी, 7 वेळा फिल्मफेअर; आशा भोसलेंचा अल्पपरिचय

भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली असून, उद्या दादरच्या शिवाजी पार्कात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Asha Bhosle Passes Away : 12 हजारांहून अधिक गाणी, 7 वेळा फिल्मफेअर; आशा भोसलेंचा अल्पपरिचय
Asha Bhosle
| Updated on: Apr 12, 2026 | 1:19 PM

भारतीय संगीत विश्वातील एक युगांत घडवणारा, चैतन्यमय आणि सर्वांना भुरळ घालणारा आवाज आज कायमचा शांत झाला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत निधन झाले. वयाच्या ९२ व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आशा भोसले यांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवत होत्या. त्यांना प्रचंड थकवा आणि छातीत संसर्गाचा त्रास होत होता. प्रकृती खालावल्यामुळे ११ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानतंर आता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व अवयव निकामी (मल्टी ऑर्गन फेल्युअर)मुळे आशा भोसले यांचे निधन झाले. त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी ही दुर्दैवी बातमी दिली.

माझी आई आशा भोसले यांचे निधन झाले आहे. उद्या दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी पार्कात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येतील. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे, असे आनंद भोसले यांनी सांगितले.

आशा भोसले यांचा अल्पपरिचय

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांना ओळखले जायचे. त्यांचे नाव सिनेसृष्टीत आदराने घेतले जाते. आठ दशकांच्या कारकिर्दीत केवळ मराठी किंवा हिंदीच नव्हे, तर बंगालीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. १२ हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली. त्यांनी संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले.

८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. १९५० ते १९६० च्या दशकात त्यांनी गायलेली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. शास्त्रीय संगीत, गझल, भजन, कॅबरे आणि पॉप अशा विविध संगीत प्रकारांमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. दिल चीज क्या है’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ आणि ‘चैन से हमको कभी’ यांसारखी अजरामर गाणी त्यांच्या अफाट प्रतिभेची साक्ष देतात. आर. डी. बर्मन यांच्यासोबतच्या त्यांच्या गाण्यांनी चित्रपट संगीताला एक वेगळीच उंची मिळवून दिली.

गौरव आणि सन्मान

त्यांच्या असामान्य कार्याची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला पद्मविभूषण पुरस्काराने २००८ मध्ये त्यांना गौरवण्यात आले. त्यानसोबतच चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल २००० मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. यासोबतच महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२१ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. तब्बल ७ वेळा त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार देण्यात आला.

आशा भोसले यांचा प्रवास हा केवळ एका गायिकेचा प्रवास नसून तो भारतीय चित्रपट संगीतासाठी सुवर्ण इतिहास मानला जातो. त्यांचा आवाज वयाच्या ९० व्या वर्षीही तितकाच तरुण आणि प्रेरणादायी वाटायचा. आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एका सुवर्णकाळाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow Us