पेपर लीकमुळे या अभिनेत्रीला 2 वेळा द्यावी लागली NEET ची परीक्षा, आता विद्यार्थ्यांना दिला पाठिंबा, ही अभिनेत्री कोण?

इंडस्ट्रीमधील या अभिनेत्रीला पेपर लीक झाल्यामुळे दोन वेळा द्यावी लागली होती NEET परीक्षा. आता दिल्लीमधील आंदोलनाला दिला पाठिंबा. कोण आहे ही अभिनेत्री?

पेपर लीकमुळे या अभिनेत्रीला 2 वेळा द्यावी लागली NEET ची परीक्षा, आता विद्यार्थ्यांना दिला पाठिंबा, ही अभिनेत्री कोण?
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 24, 2026 | 3:05 PM

देशभरात NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना अनेक सेलिब्रिटींनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सलमान खान, आलिया भट्ट यांच्यासह आता 2017 ची मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर हिनेही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे, पेपरफुटीमुळे स्वतःलाही दोनदा NEET परीक्षा द्यावी लागल्याचा अनुभव तिने प्रथमच सांगितला आहे.

‘पेपर लीकमुळे मलाही दोनदा परीक्षा द्यावी लागली’

पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये मानुषीने स्वतःचा अनुभव सांगताना लिहिले की, 2015 मध्ये पेपरफुटीमुळे तिलाही NEET परीक्षा दोन वेळा द्यावी लागली होती. काही लोक सहजपणे ‘पुन्हा परीक्षा द्या’ असे म्हणतात. पण त्यामागील विद्यार्थ्यांचा संघर्ष त्यांना दिसत नाही. ही केवळ एक परीक्षा नसते. यामध्ये अनेक वर्षांची मेहनत, झोपेचा त्याग, कुटुंबाची स्वप्ने आणि विद्यार्थ्यांच्या आशा गुंतलेल्या असतात. त्यावेळी आम्ही व्यवस्थेतील त्रुटी स्वीकारल्या आणि जे समाधान देण्यात आले ते मान्य केले. मात्र, जवळपास एक दशक उलटल्यानंतरही अशीच परिस्थिती निर्माण होत असेल तर आता बदल होणे गरजेचे आहे असं ती म्हणाली.

डॉक्टर होण्याचे स्वप्न किती कठीण असते?

मानुषीने डॉक्टर होण्याच्या प्रवासातील संघर्षावरही भाष्य केले. ती म्हणाली की, कोचिंग क्लासेसमध्ये शिकताना अनेक पालक आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त कर्ज काढून मुलांना शिक्षण देतात. काही विद्यार्थी वर्षानुवर्षे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतात.

कोरोना महामारीच्या काळात मीही माझ्या वीसाव्या वर्षांत घरी बसून अनिश्चितता, विलंब आणि नैराश्याचा सामना केला. त्या काळात प्रत्येक तरुणाला आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण आणि प्रभावी काम करण्याची इच्छा असते. अशा वेळी शिक्षणच आयुष्य बदलण्याची सर्वात मोठी संधी ठरते असं देखील तिने सांगितलं.

‘देशाविरोधात नाही, व्यवस्थेत सुधारणा व्हावी’

पुढे ती म्हणाली, मला भारतावर विश्वास आहे. आपल्या लोकशाहीवर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणत्याही समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाय हा संवाद, घटनात्मक प्रक्रिया आणि परस्पर आदरातूनच मिळू शकतो. करुणा आणि संवेदनशीलता हेच आपल्या निर्णयांचे मार्गदर्शक असले पाहिजेत. आपल्या देशातील तरुण हेच भारताचे भविष्य आहेत आणि त्यांच्या भविष्याशी तडजोड होता कामा नये असं ती म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us