
गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. ज्यामुळे नक्की सुरु तरी काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. अहमदाबाद विमान अपघात, अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्वी पती संजय कपूर याच्या अचानक निधन झाल्याची बातमी ताजी असताना, एका मराठी अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता तुषार घाडीगावकर (Tushar Ghadigaonkar) याने आत्महत्या केली आहे. अभिनेत्याने उचलेल्या टोकाच्या निर्णयामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या तुषार घाडीगावकर याने गेल्या काही दिवसांपासून काम मिळत नसल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. तुषार घाडीगावकर (Tushar Ghadigaonkar) मुंबई येथील भांडूपमध्ये वास्तव्याला होता. याप्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.
अभिनेता अंकुर वाढवे याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत तुषार यांच्या निधनाची माहिती दिली. काम मिळत नसल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याचं अंकुर वाढवे याने पोस्टमध्ये सांगितलं आहे. अंकुर वाढवे याने तुषार याचा एक फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं.
अंकुर वाढवे, तुषार याचा फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘मित्रा का? कश्यासाठी? काम येतात जातात ! आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत Tushar Ghadigaonkar तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो…’ पोस्टवर नेटकरी देखील कमेंट करत दुःख व्यक्त करत आहेत.
तुषार घाडीगावकर याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने कोणती मुख्य भूमिका साकारली नाही. पण छोट्या भूमिका स्वतःच्या खास अंदाजात बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमध्ये तुषार झळकला. काही सिनेमांमध्ये देखील तुषार याने भूमिका बजावली. ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’ या सिनेमांमध्ये देखील तुषार दिसला. तुषार याच्या निधनामुळे मराठी सिनेविश्वात मोठी खळबळ माजली आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुषार याला श्रद्धांजली वाहिली आहे.