शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांचं कार्य सिनेमातून उलगडणार; कोण साकारणार कर्मवीर अण्णांची भूमिका?
Karmveer Bhaurao Patil 'Karmaviraya' Movie : शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांचा जीवनपट सिनेमातून उलगडणार आहे. कोण साकारणार कर्मवीर यांची भूमिका? 'कर्मवीरायण' शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार...
शिक्षणाचं महत्व पटवून देणारे, खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणारे, शिक्षणाची गंगा गावोगावी पोहचवणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर येत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर सिनेमा येतो आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम भाऊराव पाटलांनी केलं. ‘कर्मवीरायण’ हा सिनेमा येत्या 17 मेला हा सिनेमा महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे.अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीर अण्णांची भूमिका साकारली आहे.
सिनेमात कोण- कोणते कलाकार दिसणार?
अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांची भूमिका साकारली आहे. सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक हे कलाकार या सिनेमात आहेत. योगेश कोळी यांनी छायाचित्रण, संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिलं आहे.
ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी ‘कर्मवीरायण’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर 7 वंडर्स चे पुष्कर मनोहर हे या सिनेमाची प्रस्तुती करत आहेत. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.अनेक महोत्सवांमध्ये या चित्रपटाचा गौरव केला गेला आहे. आता हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
कर्मवीर अण्णांचं कार्य मोठ्या पडद्यावर दिसणार
लहान वयातच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव भाऊराव पाटील यांच्या जीवनावर पडला. शिक्षणाचं महत्त्व ओळखून कर्मवीर भाऊराव पाटलांनी ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात समाजात वर्चस्ववाद फोफावला होता. त्यामुळे गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. त्या मुलांनाही शिकण्याचा समान हक्क आहे, असा भाऊराव पाटील यांचा ठाम विचार होता. त्या काळी अनेक लोकांनी भाऊरावांना विरोध केला. मात्र विरोधाला ज जुमानता शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच राहिलं आणि विविध शिक्षण संस्था उभ्या राहिल्या.
शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांनाही शिक्षणाकडे वळू लागले. त्यामुळेच ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्राला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे भाऊराव ‘कर्मवीर‘ झाले. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आता चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे.