‘खलनायक असलो तरीही..’; ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील ‘मोहीत’ची भावूक पोस्ट चर्चेत

| Updated on: Feb 21, 2022 | 3:02 PM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली.

खलनायक असलो तरीही..; येऊ कशी तशी मी नांदायलामधील मोहीतची भावूक पोस्ट चर्चेत
Nikhil Raut
Image Credit source: (Instagram/Nikhil Raut)
Follow us on

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र मालिकेच्या सुरुवातीला गाठलेली लोकप्रियतेची सीमा नंतरच्या काळात फारशी टिकवता आली नाही. सुरुवातीला अनेक लोकप्रिय मालिकांना टक्कर देत ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने टीआरपीच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवलं. मात्र कथेतील रंजकता टिकवता न आल्याने या मालिकेचा टीआरपी घसरू लागला. आता मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामध्ये मोहीतची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल राऊत (Nikhil Raut) याने नुकतंच मालिकेतील शेवटच्या दिवसाचं शूटिंग पूर्ण केलं. मालिका आणि सहकलाकारांचा निरोप घेताना निखिल भावूक झाला. सोशल मीडियावर मालिकेच्या टीमसोबतचे फोटो पोस्ट करत निखिलने भावना व्यक्त केल्या.

निखिल राऊतची पोस्ट-
‘अखेर येऊ कशी तशी मी नांदायला या आमच्या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं. गेली २० वर्षे मी या क्षेत्रात काम करत आहे. आजपर्यंतची ही माझी २५वी मालिका. खरंतर माझं पात्र ‘मोहीत’ हे डिसेंबर महिन्यातच संपलं होतं. परंतु, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असं प्रेक्षकांना वाटत होतं. मला देखील ते आवडलं असतं. परंतु कथेचा शेवट जवळ आला आणि पुढच्या महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. प्रेक्षकांनी, चाहत्यांनी या मालिकेला, खलनायक असलो तरीही माझ्या ‘मोहीत’ या पात्राला आणि आम्हा सर्वांच्याच पात्रांना खूप भरभरून प्रेम दिलं. त्याबद्दल मनापासून आभार,’ अशा शब्दांत निखिलने मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगितला.

मालिकेत निखिल साकारत असलेल्या मोहीत या पात्राचा शेवट खरंतर डिसेंबर २०२१ मध्येच झाला होता. मात्र स्वीटू आणि ओमकारच्या आयुष्यात त्याचं कमबॅक होईल, असंच अनेकदा प्रेक्षकांना वाटलं होतं. मालिकेच्या कथानकात तसं दाखवण्यातही आलं होतं. आता मालिकेचा शेवट गोड करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. ओमकार आणि स्वीटूने लग्नगाठ बांधली असून स्वीटू लवकरच आई होणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे.

निखिलने लिहिलेल्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याने साकारलेली भूमिका ही खलनायकी असली तरी निखिलचा चाहतावर्ग मोठा आहे. ‘आम्हाला तुझ्या पात्राचा राग येणं हेचं आमचं तुझ्यावरचं प्रेम आहे,’ असं एकाने कमेंट्समध्ये लिहिलं. तर ‘तू सर्वोत्तम खलनायक ठरलास,’ असं दुसऱ्या चाहत्याने लिहिलं. निखिलने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘काहे दिया परदेस’, ‘तू तिथे मी’, ‘राजा शिवछत्रपती’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचा शेवटचा एपिसोड १९ मार्च रोजी प्रसारित होणार आहे. जानेवारी २०२१ मध्ये ही मालिका सुरु झाली होती.