महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व भाई अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाची जादू सगळ्यांनाच परिचीत आहे. पुलंचं व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पेललं आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाला रसिकांची पसंतीची पावतीही मिळाली.पुलंचा जीवनपट रुपेरी पडद्यावर अनुभवणं खरंच सिनेरसिकांसाठी खास ट्रीट आहे.भाईंच्या भूमिकेत सागर देशमुख तर सुनिताताईंच्या भूमिकेत इरावती हर्षेने अफलातून काम केलं आहे. सागर देशमुखनं तर भाईंच्या भूमिकेत जान आणली असून पडद्यावरचा त्याचा सहज वावर वाखाणण्याजोगा आहे.
वायझेडमध्येच आपण काय कॅलिबरचा अभिनेता आहोत हे सागरनं दाखवून दिलं होतं. आता तर महेश मांजरेकरांसारखा गुरु मिळाल्यावर सागरनं मिळालेल्या संधीचं अक्षरक्ष: सोनं केलं आहे.
भाईंचा जीवनपट दोन भागात प्रदर्शित होणार असून पहिला भाग प्रदर्शित झाला आहे.तर दुसरा भाग 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकरांनी जेव्हा या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता वाढली होती. अपेक्षेनुसारच हा चित्रपट रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. भाईंचा जीवनपट हलक्या फुलक्या पध्दतीनं मोठ्या पडद्यावर बघायला मजा येते. याचं सगळं श्रेय चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जातं.
चित्रपटात कानडा राजा पंढरीचा हे गाणं पुन्हा एकदा नव्या ढंगात वापरलं आहे. हे गाणं बघायला आणि ऐकायला खरंच मजा येते. जयतीर्थ मेहुंडी, राहुल देशपांडे यांच्या आवाजाला अजित परबनं दिलेलं संगीत लाजवाबचं म्हणता येईल. रसिकांना हे गाणं मंत्रमुग्ध करतं. एकूणच काय तर या वीकेंडला तुम्ही चित्रपट पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट नक्की बघा. कारण महाराष्ट्राच्या लाडक्या भाईंचा हा प्रवास बघण्यासारखा आहे.