Ek Villain Returns Movie Review: थिएटरची तिकिट बुक करण्याआधी एकदा ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा रिव्ह्यू नक्की वाचा!

| Updated on: Jul 29, 2022 | 3:49 PM

मोहित सूरीचा हा 'व्हिलन' तब्बल 8 वर्षांनंतर परतला आहे. यावेळी 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये (Ek Villain Returns) मोहित सूरीने केवळ नवीन कथाच घेतली नाही तर स्टारकास्टही पूर्ण नवीन आहे.

Ek Villain Returns Movie Review: थिएटरची तिकिट बुक करण्याआधी एकदा एक व्हिलन रिटर्न्सचा रिव्ह्यू नक्की वाचा!
Ek Villain Returns Movie Review
Image Credit source: Instagram
Follow us on

दिग्दर्शक मोहित सूरीचा (Mohit Suri) ‘एक व्हिलन’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील गाण्यांवरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. तर सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या दमदार अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं. मोहित सूरीचा हा ‘व्हिलन’ तब्बल 8 वर्षांनंतर परतला आहे. यावेळी ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये (Ek Villain Returns) मोहित सूरीने केवळ नवीन कथाच घेतली नाही तर स्टारकास्टही पूर्ण नवीन आहे. जॉन अब्राहम (John Abraham), अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ची कथा

या चित्रपटाची कथा भैरव (जॉन अब्राहम) या पात्राभोवती फिरते. तो प्रियकर आहे. रसिकावर (दिशा पटानी) त्याचं खूप प्रेम असतं. पण रसिकाने भैरवचं प्रेम नाकारलं आहे. भैरवाला हे सहन होत नाही. दरम्यान कथेत गायिक आरव्हीचं (तारा सुतारिया) अपहरण होतं. आरव्हीचं तिच्या घरातून रहस्यमय परिस्थितीत अपहरण होतं. कथेतील आणखी एक प्रियकर गौतम (अर्जुन कपूर) हा आरव्हीचा प्रियकर आहे. आरव्हीच्या अचानक गायब होण्यामागे तो जबाबदार असतो. आरव्हीचा शोध घेताना गौतमचा सामना भैरवशी होतो. यापुढे कथेत अॅक्शन आणि भरपूर ड्रामा आहे. आरव्ही आणि गौतमचं नातं खूपच मनोरंजक आहे. आरव्ही ही स्ट्रगलिंग गायिका आहे. तर गौतम हा एका श्रीमंत उद्योगपतीचा बिघडलेला मुलगा आहे. गौतम आणि आरवी हे यांचं नातं ऑन अँड ऑफ दाखवलंय. कधी ते रिलेशनशिपमध्ये असतात, तर कधी त्याचं ब्रेकअप झालेलं असतं. यादरम्यान शहरात खुनाच्या घटना घडत असतात. अशातच गौतम त्याच्या प्रेयसीला वाचवू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

‘एक व्हिलन रिटर्न्स’चा रिव्ह्यू

दिग्दर्शक मोहित सूरीच्या चित्रपटाची कथा साधी असली तरी त्यात अनेक ट्विस्ट आहेत. अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत हे ट्विस्ट पहायला मिळतात. या चित्रपटाच्या कथेला अनेक प्रवाह आहेत. त्यामुळे एडिटिंगवर आणखी मेहनत घेता आली असती असं वाटतं. यामुळे चित्रपटाच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात चांगला समतोल साधला गेला असता. कथेला आणखी थोडा ट्विस्ट असता तर तो अधिक मनोरंजक, रोमँटिक थ्रिलर चित्रपट बनला असता. पटकथेला गती आणण्याच्या आणि संवादांना सशक्त बनवण्याच्या नादात लेखकाचं लक्ष चित्रपटाच्या मुख्य पात्रांवरून थोडंसं सरकल्याचं पहायला मिळतं. याचा परिणाम असा झाला की यातील पात्रं ही एकमेकांशी जोडलेली दिसत नाहीत.

हे सुद्धा वाचा

याशिवाय चित्रपटात महिलांबद्दलची नकारात्मकता अधिक दाखवण्यात आली आहे, ती दूर करता आली असती. यामुळे प्रेम, दुरावा, प्रेमाचा नकार आणि त्यामुळे होणारी वेदना या गोष्टींपासून कथा दूर जाते. शाद रंधावा आणि जेडी चक्रवर्ती यांच्या पात्रांवर थोडी आणखी मेहनत घेता आली असती. या चित्रपटात पोलिसांची मोठी कामगिरी पाहायला मिळाली आहे. कथेत ते अधिक चांगल्या पद्धतीने मांडलं असतं तर पडद्यावर ते अधिक चांगल्याप्रकारे सिद्ध झालं असतं.

‘एक व्हिलन’ या चित्रपटातील ‘गलियाँ’ हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. या सीक्वेल चित्रपटात याच गाण्याचं नवीन व्हर्जन पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतं, जे छान वाटतं. पण याखेरीज आपली छाप सोडणारं दुसरं गाणं यात नाही. त्यामुळे रोमँटिक थ्रिलरसाठी हा चित्रपट थोडा कमी पडताना दिसतो.

चित्रपटाच्या मुख्य कलाकारांपैकी कोणत्याही कलाकाराचा अभिनय इतका दमदार नाही की ज्याची चर्चा वेगळी केली जाऊ शकेल. तोच तोचपणा अभिनयात पहायला मिळतो. इतर सहकलाकारांचा वाटाही फारसा नाही. प्रत्येकाला मर्यादित चौकटीत काम करण्याची संधी मिळाली आहे. या पात्रांना थोडी अधिक संधी दिली असती, तर कलाकारांना वैयक्तिक पातळीवर काहीतरी चांगलं दाखवण्याची संधी मिळाली असती. एकूणच ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये रोमँटिक-थ्रिलरच्या बाबतीत बरेच ट्विस्ट आणि टर्न्स आहेत, परंतु चित्रपटातील पात्रं किंवा त्यांची कथा प्रेक्षकांवर आपली विशेष छाप सोडत नाही.