महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातल्या ‘सालबर्डी’ गावातली रहस्यमयी कथा; अंगावर काटा आणणारा थरारपट

सत्यघटनेमागील सत्य.. या टॅगलाइनसह 'सालबर्डी' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे पोस्टर पाहून या चित्रपटाची कथा रहस्यमयी असेल, असं दिसून येत आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागातल्या गावातली ही कथा आहे.

महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातल्या सालबर्डी गावातली रहस्यमयी कथा; अंगावर काटा आणणारा थरारपट
Salbardi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 22, 2026 | 1:54 PM

इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट नुकताच जाहीर झाला आहे. येत्या एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा पोस्टर पाहूनच चित्रपटाची गूढ कथा अधोरेखित होते.

नेब्यूला फिल्म्स निर्मित ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ.गजानन जाधव, राम जाधव यांनी केली आहे. तर रमेश साहेबराव चौधरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘सालबर्डी’ चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून या चित्रपटाच्या विषयाची भीषणता अधोरेखित होत आहे. या गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं काळकभिन्न वास्तव हा या चित्रपटाचा गाभा आहे. भय आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘रहस्य’ शोधताना काय होणार? हे सत्य कोण आणि कसं बाहेर काढणार? हे पाहणं अतिशय थरारक असणार आहे. भीती, थरार, विश्वास-अविश्वास यांचा अकल्पित अनुभव देणाऱ्या ‘सालबर्डी’ चित्रपटात मराठीतल्या उत्तम कलाकारांची मांदियाळी आहे. परंतु हे कलाकार नेमके कोण आहेत, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

‘सालबर्डी’ चित्रपटाचं छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचं आहे. तर पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे यांचं आहेत. गुरु ठाकूर, मुकुंद भालेराव यांनी लिहिलेल्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचं संगीत लाभलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटाला लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर, आशीष पाटील यांनी केलं आहे. कार्यकारी निर्माते दिपक कुदळे पाटील आहेत. वेशभूषा प्रणिता चिंदगे तर रंगभूषा श्रीनिवास मेनूगे यांची आहे. कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचं आहे.