“सरकारकडे मागू नका, तर कुठलं सरकार करायचं हे ठरवा,” नाना पाटेकरांचं शेतकऱ्यांना आवाहन

| Updated on: Mar 05, 2024 | 1:23 PM

नाशिकमधल्या शेतकरी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं. सरकारकडे मागू नका, तर कुठलं सरकार करायचं हे ठरवा, असं ते शेतकऱ्यांना म्हणाले.

सरकारकडे मागू नका, तर कुठलं सरकार करायचं हे ठरवा, नाना पाटेकरांचं शेतकऱ्यांना आवाहन
नाना पाटेकर
Follow us on

नाशिक : 5 मार्च 2024 | देशभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची एण्ट्री झाली आहे. नानांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. सरकारकडे मागू नका, तर कुठलं सरकार करायचं हे ठरवा, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय. याचसोबत त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याविषयीही भाष्य केलंय. नाशिकमधल्या शेतकरी साहित्य संमेलनात ते बोलत होते. “आम्ही कशाच्या आशेवर जगायचं? रोज आम्हाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्याची तुम्हाला किंमत नसेल तर मग आम्ही तुमची किंमत का करायची,” असा सवालही नाना पाटेकरांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांची बाजू घेत नाना म्हणाले, “आधी 80 ते 90 टक्के शेतकरी होते. आता शेतकऱ्यांची टक्केवारी 50 ते 60 वर आली आहे. तुम्ही सरकारकडे काही मागू नका. आता कुठलं सरकार आणावं, याचा निर्णय घ्या. मला राजकारणात जाता येत नाहीये. कारण माझ्या पोटात जे आहे ते ओठांवर येतं. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मला त्या पक्षातून काढून टाकतील. असं करत करत महिनाभरात सगळेत पक्ष संपलेले असतील. मग कशाला जायचं तिथं? इथे तुमच्यासमोर म्हणजेच आमच्या शेतकरी बांधवांसमोर आम्ही मोकळेपणे बोलू शकतो.”

हे सुद्धा वाचा

“जर मी आत्महत्या केली तरी पुढच्या जन्मी शेतकरी म्हणूनच जन्म घेणार. शेतकरी असं कधीच म्हणणार नाही की मला शेतकऱ्याचा पुनर्जन्म नको. आपल्याला जनावरांची, प्राण्यांची भाषा समजते. मग योग्य वेळी तुम्हीला शेतकऱ्यांची भाषा का बोलता येत नाही”, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. नानांनी याआधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाष्य केलं होतं.

नानांनी याआधीही विविध मुलाखतींमध्ये राजकारणाविषयी परखड मत मांडलं होतं. “आपण राजकारणाविषयी याठिकाणी बोलू नये, ते एवढ्यासाठी की मग मी फार परखडपणे बोलेन. त्यावरून पुन्हा कॉन्ट्रोव्हर्सी होईल. मी कुठल्याही पक्षाचा नाही. माझे वडील कट्टर काँग्रेसवादी होते, मी कट्टर शिवसेनेचा होतो. आज मला भाजप खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते. मला नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा आमचे देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करतात, ते मला आवडतं. ज्या पद्धतीने नितीन गडकरी काम करतात, ते मला आवडतं,” असं ते म्हणाले होते.