‘राजा शिवाजी’ पाहताच जयंत पाटील यांचे डोळे पाणावले, रितेश देशमुखला फोन केला अन् म्हणाले; विलासरावांच्या…
जयंत पाटील यांनी नुकताच रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहताना अंगावर शहारे आले आणि डोळे पाणावले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या पोस्टवर रितेशनेही प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोठे नेते जयंत पाटील यांनी नुकताच अभिनेता रितेश देशमुखचा बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित चित्रपटाचं आणि रितेशच्या कामाचं कौतुक केलं. त्यावर रितेशनेही प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मोठी फौज पहायला मिळते. हा चित्रपट पाहताना अंगावर शहारे आले आणि डोळे पाणावले, अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
जयंत पाटील यांची पोस्ट-
‘प्रतिक पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा मोफत शो वाळवा तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांसमवेत पाहताना अंगावर शहारे आले, डोळे पाणावले. स्व. विलासराव देशमुख यांची मुले रितेश देशमुख, धीरज देशमुख, सून जिनिलिया देशमुख आणि नातवंड या सर्वांना चित्रपटात पाहून अभिमान वाटला. स्व. विलासरावांच्या संस्काराची पेरणी त्यांच्या कुटुंबात अतिशय सक्षमपणे झाली आहे, याचा प्रत्यय आला. हा इतिहास केवळ चित्रपट म्हणून नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील अभिमान म्हणून त्यांनी जिवंत केला आहे,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
आदरणीय @Jayant_R_Patil साहेब,
आपला फोन आला आणि आपल्याला शिवरायांच्या शौर्यगाथेवर आधारित आमचा चित्रपट ‘राजा शिवाजी’ आवडल्याचे समजल्याने आम्हाला खूप आनंद झाला. आपण संपूर्ण टीमचे कौतुक केले, प्रत्येकाच्या कामाची दखल घेतली आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली, याने आम्हाला खूप ऊर्जा आणि… https://t.co/Jsl2GDYYV7— Riteish Deshmukh (@Riteishd) May 18, 2026
या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देताना त्यांनी पुढे म्हटलंय, ‘आपल्या मातीची ओळख, रक्तातील स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या पराक्रमाची जाज्वल्य गाथा प्रत्येकाने पाहावी. आपल्या मराठमोळ्या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार तर केलाच आहे, मात्र जगभरातील प्रेक्षकांच्या मनात छत्रपतींची एक अनोखी छाप सोडली आहे, याचा आनंद मोठा आहे.’
जयंत पाटील यांच्या या पोस्टवर रितेशनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आदरणीय जयंत पाटील साहेब, आपला फोन आला आणि आपल्याला शिवरायांच्या शौर्यगाथेवर आधारित आमचा चित्रपट ‘राजा शिवाजी’ आवडल्याचं समजल्याने आम्हाला खूप आनंद झाला. आपण संपूर्ण टीमचं कौतुक केलं, प्रत्येकाच्या कामाची दखल घेतली आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली, याने आम्हाला खूप ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळालं आहे. आमच्या या प्रयत्नांना आपले मार्गदर्शन आणि प्रेम मिळत राहू हीच अपेक्षा. मी आणि आमची संपूर्ण टीम आपली मन:पूर्वक आभारी आहे,’ अशा शब्दांत त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.