Ramayana: बीफ खाणारा रणबीर श्रीराम यांच्या भूमिकेत नकोच..; अभिनेत्रीचा संताप, जाहीर माफीची मागणी
Ranbir Kapoor: बीफ खाणारी व्यक्ती प्रभू श्रीराम यांची भूमिका कशी साकारू शकते, असा सवाल करत अभिनेत्रीने माफीची मागणी केली आहे. अन्यथा रणबीरवर बंदी घालण्याची मोहीम सुरू ठेवण्याचा इशारा दिला.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. यावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काहीजण त्याच्या निवडीचं कौतुक करत आहेत, तर काहींनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यादरम्यान अभिनेत्री निकिता रावलने रणबीरच्या निवडीला थेट विरोध करत त्याच्या माफीची मागणी केली आहे. माफी न मागितल्यास सोशल मीडियावर त्याच्याविरोधात ट्रेंड सुरू ठेवणार असल्याचा इशाराच तिने दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निकिताने रणबीरच्या जुन्या वक्तव्याचाही उल्लेख केला, ज्यामध्ये त्याने बीफ म्हणजेच गोमांस खाल्ल्याची कबुली दिली होती.
‘बॉलिवूड मॅस्कॉट’ला दिलेल्या या मुलाखतीत निकिता म्हणाली, “रणबीरने लाखो लोकांच्या भावनांशी खेळ केला आहे. तो म्हणतोय, मी गोमांस खातो आणि तरीही तो श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. त्याच्यावर थेट बहिष्कारच घालावा. मी #BoycottRanbirKapoor ही मोहीम सुरूच ठेवीन. जर त्याला त्याच्याकडून थोडी जरी चूक झाली आहे, असं वाटत असेल तर त्याने पुढे येऊन त्या लाखो लोकांची माफी मागावी. होय माझ्याकडून चूक झाली, हे त्याने मान्य करावं. आम्ही त्याला माफ करू. जोपर्यंत रणबीर माफी मागत नाही, तोपर्यंत मी त्याच्यावर बहिष्कार टाकेन. त्याचं वैयक्तिक चारित्र्य प्रभू श्रीराम यांच्या चारित्र्याला न्याय देत नाही. या निर्माते फक्त व्यवसायाचा विचार करत आहेत. जो माणूस उघडपणे सांगतोय की तो गोमांस खातो, त्याला ही भूमिका देणं हा लाखो लोकांच्या श्रद्धेचा, भावनांचा आणि प्रभू श्रीराम यांचाही अपमान आहे. आता सर्व सनातनी सदस्य कुठे आहेत? आता कोणी आवाज का उठवत नाही?”
‘रामायण’मधील श्रीराम यांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरने मद्यपान आणि मांसाहार सोडून दिल्याचं म्हटलं गेलंय. पण जवळपास 15 वर्षांपूर्वी एका मुलाखतीत रणबीरने बीफ खाण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. “मला बीफ खायला खूप आवडतं. मी बदकाचंही मांस खाल्लं आहे. मटण, पाया हेसुद्धा मला खूप आवडतात”, असं त्याने म्हटलं होतं.
‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच साई पल्लवी, यश, सनी देओल, अरुण गोविल, लारा दत्ता, विवेक ओबेरॉय, रवी दुबे, रकुल प्रीत सिंह यांच्याही भूमिका आहेत. तब्बल 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.