आयेशा सय्यद, मुंबई : नाटककार अभिराम भडकमकर (Playwright Abhiram Bhadkamkar) यांची महत्वाची साहित्यकृती असलेली ‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी नुकतीच स्टोरीटेल (Storytel) मराठीवर प्रकाशित झाली आहे. शीर्षकातूनच कुतुहल निर्माण करणारी ही कादंबरी श्रोत्यांना रसरशीत बागवानी बोली ऐकण्याचा समृद्ध अनुभव तर देतेच पण आजचा मुस्लीम मोहल्ला कसा आहे, आजच्या मुस्लीम तरुणांपुढे कोणते प्रश्न आहेत, त्यांच्या जगण्यातली अस्वस्थता याचंही नेमकं चित्रण करते. बागवानी बोलीचा अत्यंत सुरेख वापर हे या कादंबरीचं एक मोठं वैशिष्ट्य असल्याने ऑडिओबुकमधून आशय अधिक प्रभावीपणे पोहोचतो. कादंबरीकार अभिराम भडकमकर यांच्या ‘असा बालगंधर्व’ आणि ‘अॅट एनी कॉस्ट’ या दोन कादंबऱ्यांनंतरची ‘इन्शाअल्लाह’ ही तिसरी कादंबरी आहे. (Storytel Marathi)
इन्शाअल्लाह कादंबरी सुरु होते, ती कोल्हापुरातील एका मोहल्ल्यातून जुनैद हा विशीचा तरुण गायब होतो, त्या घटनेपासून. जुनैदसह त्याच मोहल्यातला आणखी एक तरुण आणि बाहेरून मोहल्यात आलेला तिसरा एक तरुण असे तिघे गायब होतात. काही दिवसांनी जुनैद वगळता इतर दोघांचा पत्ता लागतो, पण जुनैदचं काहीच कळत नाही. कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलीस उधळून लावतात आणि या अयशस्वी कटात जुनैदचा सहभाग असल्याच्या संशयावरून ते त्याचा शोध घेऊ लागतात, पण जुनैद कुठेच सापडत नाही, तेव्हा तो कुठे जातो, त्याचं नेमकं काय होतं? या घटनेमुळे त्याची आई जमीलावर होणारा दु:खाचा आघात, जुनैदचा शोध घेण्याचा तिचा प्रवास, त्यातले खाचखळगे, आणि या सगळ्याला समांतर असणारा तिच्या मोहल्ल्याचा एक मोठा प्रवास, या प्रवासातली सांस्कृतिक स्थित्यंतरं असा बऱ्यापैकी मोठा पट या कादंबरीतून उलगडलेला आहे. जुनैदच्या शोधासह समांतर अशी अनेक उपकथानकंही कादंबरीत सहज गुंफलेली आहेत आणि हे करताना कथनाची वीण कुठेही सैल झालेली नाही, कादंबरीतलं प्रवाहीपण अखेरपर्यंत टिकून राहिलेलं आहे, ही एक कादंबरीची चांगली बाजू.
कादंबरीकार अभिराम भडकमकर यांच्या ‘असा बालगंधर्व’ आणि ‘अॅट एनी कॉस्ट’ या दोन कादंबऱ्यांनंतरची ‘इन्शाअल्लाह’ ही तिसरी कादंबरी आहे. एरवी गुण्यागोविंदाने राहणाऱ्या हिंदू-मुस्लिम समाजांमध्ये ‘मजहब’ नावाचे जिहादी विष कालवून त्या एकसंध आणि निरभ्र समाजजीवनाची अत्यंत कुशलपणे कशी लक्तरे केली जातात, याचे दर्शन म्हणजे ही कादंबरी आहे.
भडकमकर हे मुळात नाटककार असल्याने दृश्यमयता हे त्यांच्या लेखनाचं एक बलस्थान आहे. त्यामुळे कादंबरीतलं दृश्य नि दृश्य डोळ्यापुढे उभं राहतं. घटनांचा पट वेगानं पुढे सरकतो आणि त्याचा दृश्य परिणाम वाचनीयता आणखी वाढवतो. लेखकानं रंगवलेला मोहल्ला अगदी वाचकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो किंवा वाचकाला बसल्याजागी स्वत:च त्या त्या ठिकाणी फिरून आल्यासारखं वाटावं इतकं रसरशीत आणि उत्कट चित्रण मोहल्ल्याचं केलेलं आहे.
हेही वाचा: