खराब रिव्ह्यूमुळेच खूप फायदा..; वादादरम्यान ‘पेद्दी’च्या अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
'पेद्दी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. अशातच हैदराबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात या चित्रपटातील अभिनेत्याने रिव्ह्यूवरून केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. खराब रिव्ह्यूमुळे आमचा फायदा होत असल्याचं त्याने म्हटलंय.

साऊथ सुपरस्टार रामचरणच्या ‘पेद्दी’ या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूरच्या सीन्सवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. असं असलं तरी बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट चांगली कमाई करतोय. याच जबरदस्त कमाईच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रामचरणसोबतच दिग्दर्शक-निर्माते आणि इतर कलाकारसुद्धा उपस्थित होते. ‘पेद्दी’मध्ये अप्पलसूरी नावाची भूमिका साकारलेला अभिनेता जगपती बाबूसुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होता. यावेळी त्याने चाहत्यांना संबोधिक करताना असं वक्तव्य केलं आहे, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
काय म्हणाला अभिनेता?
जगपती बाबूने अशा लोकांचे आभार मानले, ज्यांनी ‘पेद्दी’ या चित्रपटाला वाईट म्हटलंय. त्याचप्रमाणे जान्हवी कपूरच्या दृश्यांवरून झालेल्या एकंदरीत वादाचा या चित्रपटाला मोठा फायदा होत असल्याचं, त्याच्या वक्तव्यातून सूचित झालं. ‘न्यूज 18’ने दिलेल्या वृत्तानुसार जगपती बाबू या कार्यक्रमात म्हणाला, “पेद्दी खेळला, लढला आणि जिंकला. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही पेद्दीच्या टीमला विजयासाठी लढावं लागलं. कदाचित हा एकमेव चित्रपट असेल ज्याला दोनदा जिंकावं लागलं. चित्रपटाने 300 कोटी रुपये कमावले की 400 कोटी, हा वेगळा विषय आहे. खरंतर या चित्रपटाची अवस्था इतकी नाजूक होती की तो पाहण्यासाठी 300 रुपयांचं तिकिट काढणाऱ्या व्यक्तीच्या निर्णयावर त्याचं भवितव्य अवलंबून होतं. हा चित्रपट व्यवसाय असा आहे, जिथे प्रेक्षकांची धारणाच चित्रपटाचं भवितव्य ठरवते. त्यामुळे अशा कथेसाठी निर्माता शोधणं सोपं नव्हतं. त्यातही रामचरणसारख्या मोठ्या स्टारला त्यात काम करण्यासाठी तयार करणं अजूनही कठीण होतं.”
खराव रिव्ह्यू लिहिणाऱ्यांचेही मानले आभार
“जर हा चित्रपट फसला असता, तर लोकांनी त्यावर जोरदार टीका केली असती. पण रामचरणने चित्रपट पूर्ण जबाबदारीने हाताळला. या चित्रपटात तो केवळ एक माणूस म्हणून नाही तर सुपरमॅन आणि ही-मॅनसारखा दिसला. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. ज्यांनी नकारात्मक समीक्षा लिहिल्या त्यांचे तर मी अधिकच आभार मानतो. कारण त्यांनीही नकळतपणे आम्हाला खूप मदत केली आहे”, असं तो पुढे म्हणाला. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत जगभरात 250 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.