वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेणारी ‘फुला’

एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमयी कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अस्सल संगीताची मेजवानी मिळणार आहे. यात सात गाण्यांचा अल्बम ऐकायला मिळणार आहे.

वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेणारी फुला
Phula movie
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 15, 2026 | 9:00 PM

वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी ‘फुला’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अस्सल संगीताची मेजवानी मिळणार असून, बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटात सात गाण्यांचा सुरेल अल्बम ऐकायला मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातल्या काही तरी नवीन करू पाहणाऱ्या नवोदित तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट तयार केला आहे. पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचंच आहे. तर चित्रपटाची पटकथा रवी किरण जावीर यांनी लिहिली आहे.

‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमयी कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. चित्रपटात कान्हा तुझी बासरी, माझा राजा मल्हारी, आसरा तू माझ्या जीवाचा, कुंकू कोरलं कपाळी, मुरळी झाले मी गं बाई, कपाळी सजलं बाशिंग, डर्बीचा थरार ही सात गाणी आहेत. प्रसंगानुरूप येणाऱ्या या गाण्यातून वाघ्या-मुरळीच्या लोकसंस्कृतीचं चित्रण करत मुरळीच्या भावभावनाही मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अस्सल लोकसंस्कृती आणि आशयघन गाणी असलेला ‘फुला’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणं हा एक अनुभव ठरणार आहे. येत्या 17 एप्रिलपासून ‘फुला’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. तर नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचं आहे. वेशभूषाकार कोमल जावीर, अक्षता पाटील असून रंगभूषाकार समाधान भोरे यांनी काम पाहिलं आहे. ज्या कलाकारांना डोक्यावर घेऊन आपण ज्या कलाकारांचं कौतुक करतो अशा कलाकारांचं प्रत्यक्षातील आयुष्य कस असतं यावर प्रत्यक्षपणे प्रकाश टाकण्याचं प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. नव्या दमाच्या तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट केला आहे.

Follow Us