कल्याणमधील भीषण अपघातात प्रसिद्ध रिलस्टारचा मृत्यू, स्त्यावरील खडीमुळे दुचाकी घसरली

एका प्रसिद्ध रिल्स स्टारचा कल्याण येथे अपघात झाला. या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

कल्याणमधील भीषण अपघातात प्रसिद्ध रिलस्टारचा मृत्यू, स्त्यावरील खडीमुळे दुचाकी घसरली
Prem Bhati
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 14, 2026 | 12:37 PM

सध्या सोशल मीडियाचे जग आहे. काही रिल्सस्टार तयार करत असलेला हॉरर आणि कॉमेडी कंटेन्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्यांची लोकप्रियता देखील प्रचंड असल्याचे दिसत आहे. असाच हॉरर आणि विनोदी रिल्स तयार करणारा कल्याण येथील रिल्स स्टारचा अपघाती मृत्यू झाला आहे. 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास रस्त्यावरील खड्डे आणि खडीमुळे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने रिल्स स्टारचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

रिल्स स्टार प्रेम भाटीचे निधन झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रेम भाटी 13 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कल्याणमधील मोहने परिसरातून दुचाकीवरुन घरी परत जात होता. मोहने येथील शिवसेना शाखेजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे आणि विखुरलेली खडीमुळे त्याचा अपघात झाला. रस्त्यावरील खडीमुळे गाडी घसरली आणि प्रेमचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तो रस्त्यावर जोरात आदळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तातडीने प्रेमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कोण होता प्रेम भाटी?

कॉमेडी आणि हॉरर रिल्समुळे प्रेम भाटी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. त्याचे इन्स्टाग्रामवर जवळपास 83 हजार फॉलोवर्स आहेत. तर यूट्यूबवर त्याचे 3 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. आता त्याच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रेम हा अतिशय गरीब कुटुंबातून आहे. त्याच्या वडिलांचे हेअस स्टाईलचे दुकान आहे. आता प्रेमच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एका तरुणाचा बळी गेल्यामुळे नागरिकांनी प्रशासनावर टीका केली आहे. रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आरोप केले आहेत. रस्त्यावर पसरलेली खडी आणि खड्ड्यांमुळे हा अपघात झाला आहे. जबाबदार कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. रस्ते दुरुस्तीमधील हलगर्जीपणा निष्पाप नागरिकांचा जीव घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Follow Us