त्या नराधमाचं एन्काऊंटर झालं तरच..; भोरमधल्या चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली आहे. प्रवीण तरडेंनी थेट आरोपीच्या एन्काऊंटरची मागणी केली आहे.

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी 65 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संतप्त नसरापूर ग्रामस्थांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला. भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर एका गोठ्यात अत्याचार करण्यात आलं. त्यानंतर आरोपीने मुलीला दगडाने ठेचून मारलं. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचं उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. याप्रकरणी सर्वच स्तरांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहित राग व्यक्त केला आहे.
प्रवीण तरडे यांची पोस्ट-
उद्या त्या नराधमाचं एन्काऊंटर झालं तरच मानू की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आहे. अन्यथा भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा, अशी पोस्ट प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर लिहिली आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध खून, बलात्कार, तसंच बालकांचं लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शनिवारी चिमुकलीचा मृतदेह धायरी परिसरात आणण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यानंतर नातेवाईक आणि नागरिकांनी वडगाव उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन केलं. अखेर पोलिसांनी आंदोलन आणि नातेवाईकांची समजूत घालून त्यांच्याशी संवाद साधला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी धायरी इथं जाऊन पीडित मुलीच्या पालकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणीही केली.