
गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासंदर्भात, तिथे स्वच्छता राखण्यासंदर्भात अनेकदा आवाहन केलं जातं. परंतु आजही काहीजण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतात. अशा लोकांवर अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नुकतेच ते प्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास पाटील यांच्यासोबत रायगडावर गेले होते. तिथल्या दगडांच्या खाच्यांमध्ये त्यांना कचरा, चिप्सची पाकिटं आढळून आली. याचाच व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्यांनी कोणी तो कचरा तिथे टाकलाय, त्यांनी परत रायगडावर येऊ नये, असं त्यांनी थेट म्हटलंय. प्रवीण तरडेंच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“आज डॉ. विश्वास पाटील यांच्यासोबत रायगड पहायला आलोय. इथल्या प्रत्येक भिंतीला, या दगडांना हात लावताना कधीतरी इथून महाराज गेले असतील, याला स्पर्श केला असेल.. म्हणजे महाराजांच्या असण्याचा भास निर्माण होतो. आपल्या लोकांनी इथे काय केलंय बघा. आम्ही आता इथे फिरत होतो, तर या ऐतिहासिक वास्तूंच्या खपच्यांमध्ये कचरा, चिप्सचे पॅकेट्स ठेवण्यात आले आहेत. ज्यांनी कुणी हे इथे टाकलं असेल, त्यांना मी मनापासून विनंती करतो.. बाबा तू परत रायगडावर येऊ नको रे. ही कचरा टाकायची जागा नाहीये. इथं आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला, बापजाद्यांनी रक्त सांडलं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे. आजही महाराज इथं आहेत, ते कुठंही गेलेले नाहीत. याचं भान ठेवा,” अशा शब्दांत प्रवीण तरडेंनी राग व्यक्त केला.
तर फक्त स्पर्श नव्हे तर परिसस्पर्श.. म्हणजे लोखंडाला स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं. तर महाराजांनी या परिसराचं सोनं बनवलं आहे, अशी भावना विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
“इथे जेवढे पर्यटक येतात, त्या सर्वांना एकच विनंती आहे की बाबांनो आपला रायगड स्वच्छ ठेवा रे. निदान रस्त्यावर पडलेला कचरा आम्ही उचलू तरी पण असं दगडांच्या खापच्यात घातलेल्या या कचऱ्याचं काय करायचं? आपल्या राजंचा हा किल्ला आहे. रायगड हा आपला आहे. त्यामुळे जपून,” असं आवाहन त्यांनी पर्यटकांना केलं आहे.