
तब्बल 9 कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्याने अभिनेता राजपाल यादवला तिहार तुरुंगात सरेंडर व्हावं लागलं. आज (12 फेब्रुवारी) त्याच्या जामिन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी कोर्टाने कर्ज फेडण्यावरून राजपालला चांगलंच फटकारलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपालला विचारलं की, पैसे उधार घेतल्याचं कबुल केल्यानंतर आता तू शिक्षा रद्द करण्याची करण्याची मागणी करतोय का? कोर्टाने असंही म्हटलंय की, “तू गुन्हा कबूल केलंस आणि सांगितलं की पैसे परत करेन. मग आता शिक्षा झाल्यावर ती रोखण्यासाठी अर्ज करतोय.”
“आम्ही त्याच तारखेला सांगितलं होतं की आम्हाला हे प्रकरण सोडवायचं आहे. राजपालने कोर्टात म्हटलेल्या शब्दांचा मान राखण्यासाठी सरेंडर केलं. चित्रपटात जी 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, ती त्याला परत करायची आहे. त्यापैकी 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम परत करण्यात आली आहे”, अशी बाजू राजपालच्या वकिलांनी मांडली आहे. त्यावरून कोर्टाने राजपालला फटकारलं आहे.
“हा वाद का सुरू आहे हेच मला समजत नाही. तुम्ही म्हणालात की तुम्ही पैसे द्याल. नंतर अनेक वर्षांत तुम्ही पैसे दिले नाहीत. आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे तुम्हाला आत्मसमर्पण करावं लागलं. या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण दिसत नाही. तुम्ही पैसे देण्याचं आश्वासन दिलं. तुम्हाला 25 ते 30 संधी देण्यात आल्या. आता तुम्हाला हा खटला पुन्हा सुरू करायचा आहे का? तुम्ही पैसे देण्यास उशीर का केला हे तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. मी सहानुभूती बाळगू शकतो, पण कायदा हा कायदा आहे”, असं न्यायाधीश म्हणाले.
यावेळी राजपालच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केलं की, ते न्यायालयात सेफ्टी डिपॉझिट जमा करण्यास तयार आहेत. परंतु राजपालच्या कुटुंबात लग्नकार्य असल्याने जामीन हवा आहे. आता या जामिनावर न्यायालय कोणता निर्णय देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या या कठीण काळात राजपालला बॉलिवूड सेलिब्रिटींकडून मदत मिळत आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याने दिल्लीच्या तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांसमोर त्याची परिस्थिती सांगितली. माझ्याकडे पैसे नाहीत, मी एकटा पडलोय, माझे कोणते मित्रही नाही, असं तो भावूक होत म्हणाला होता.