राम गोपाल वर्मा विरोधात लखनऊमध्ये गुन्हा; एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विरोधात वादग्रस्त ट्वीट

राम गोपाल वर्मा यांनी महाभारतातील (Mahabharat) दोन नावं वापरत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात वादग्रस्त ट्वीट केलं होतं. या ट्वीटनंतर रामगोपाल वर्मांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

राम गोपाल वर्मा विरोधात लखनऊमध्ये गुन्हा; एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विरोधात वादग्रस्त ट्वीट
राम गोपाल वर्मा
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 27, 2022 | 11:43 PM

मुंबई : चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्याविरोधात लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu), पांडव आणि कौरवांबाबत राम गोपाल वर्माने वादग्रस्त ट्वीट केल्याचा आरोप आहे. राम गोपाल वर्मांवर आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एडीसीपी राघवेंद्र मिश्रा यांनी दिलीय. राम गोपाल वर्मा यांनी महाभारतातील (Mahabharat) दोन नावं वापरत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात वादग्रस्त ट्वीट केलं होतं. या ट्वीटनंतर रामगोपाल वर्मांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

राम गोपाल वर्माचं नेमकं ट्वीट काय?

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या ट्वीटनंतर राम गोपाल वर्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्या ट्वीटवरुन वाद निर्माण झाल्यानंतर अखेर राम गोपाल वर्माने स्पष्टीकरण दिलंय. कुणाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असं त्याने म्हटलंय. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषीत झाल्यानंतर ‘अगर द्रौपदी राष्ट्रपती हैं, तो पांडव कौन हैं? और सबसे अहम बाद ये है की कौरव कौन हैं?’, असं ट्वीट राम गोपाल वर्मा यांनी केलंय. त्यांच्या ट्वीटनंतर भाजप नेते गुडूर नारायण रेड्डी आणि टी. नंदेश्वर गौड यांनी हैदराबाद एबिड्स पोलीस ठाण्यात राम गोपाल वर्मा विरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी राम गोपाल वर्मावर एससी-एसटी लोकांचा अपमान केल्याचा आरोप लावला आहे.

राम गोपाल वर्माकडून स्पष्टीकरण

आपल्या ट्वीटवरुन वाद निर्माण झाल्यानंतर राम गोपाल वर्माने स्पष्टीकरणही दिलंय. ‘मी असं केवळ विडंबन म्हणून बोललो होतो आणि त्याचा दुसरा कुठलाही उद्देश नव्हता. द्रौपदी महाभारतातील एक प्रमुख व्यक्तीमत्व आहे. पण हे नाव खूप कमी लोकांचं आहे. मला या नावाशी संबंधित व्यक्ती फक्त आठवले. त्यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता’, असं राम गोपाल वर्माने स्पष्टीकरण देताना म्हटलंय.