Dhurandhar 2: भारतातील ‘या’ राज्यात ‘धुरंधर 2’वर आणणार बंदी? कारण काय?

Dhurandhar 2: रणवीर सिंहचा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने भारतात कमाईचा 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अशातच भारतातील एका राज्यात यावर बंदीची मागणी होतेय.

Dhurandhar 2: भारतातील या राज्यात धुरंधर 2वर आणणार बंदी? कारण काय?
Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2026 | 1:35 PM

Dhurandhar Ban Demand in Tamilnadu: बॉक्स ऑफिसवर सध्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या कमाईने त्सुनामीच आणली आहे. भारतासोबतच परदेशातही हा चित्रपट छप्परफाड कमाई करतोय. 19 मार्च रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहच्या या चित्रपटाने जगभरात कमाईचा 800 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत सध्या याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. परंतु जितकं या चित्रपटाचं कौतुक होत आहे, तितकीच त्यावर टीकासुद्धा केली जात आहे. काहीजण आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाला प्रचारकी असल्याचं म्हणत आहेत. अशातच हा चित्रपट आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. ‘धुरंधर 2’ या चित्रपटावरच बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. तमिलनाडू निवडणुकांपूर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी होत आहे.

बंदीची मागणी का?

तमिळनाडू राज्यात या चित्रपटाला विरोध केला जात आहे. हे प्रकरण थेट मद्रास उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. तमिळनाडूत सध्या निवडणुकांचं वातावरण आहे, अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला जात आहे. ‘डेली थंती’ या तिथल्या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी मद्रास हायकोर्टात एक अपील दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे. शीला नावाच्या एका वकिलाने तमिळनाडू राज्यातील विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत खंडपीठाकडे चित्रपटावर बंदीची मागणी केली. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात तीव्र राजकीय संदर्भ असून मतदारांच्या भावनांवर तो प्रभाव टाकू शकतो, असंही त्यात नमूद केलंय. या चित्रपटाचा आणि त्याच्या संवेदनशील कथेचा राजकीयदृष्ट्या निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता वकिलांनी अपिलात व्यक्त केली.

‘धुरंधर 2’ हा चित्रपट मतदारांवर प्रभाव टाकू शकतो, त्यामुळे तमिळनाडूमध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे. दरम्यान सरन्यायाधीशांनी यावर औपचारिक याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले असून त्यानंतरच कोर्टात याप्रकरणी सुनावणी होईल. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर 2’ हा सत्य घटनांवर आधारित काल्पनिक चित्रपट असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये पाकिस्तानमधील ल्यारी, भारतावर झालेले दहशतवादी हल्ले यांचा संदर्भ देण्यात आला आहे. यातील काही भूमिका खऱ्या आयुष्यातील असल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटातील बंदीच्या मागणीवर अद्याप दिग्दर्शक किंवा निर्मात्यांकडून कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.

Follow Us