असे आत्मे भूत-पिशाच्च बनून फिरतात; संचिता उगलेच्या मृत्यूप्रकरणी भाजप खासदार हे काय बोलून गेले?
टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूप्रकरणी भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संचिताने उचललेलं टोकाचं पाऊल अत्यंत चुकीचं असून असे आत्मे इथेच भूत, पिशाच्च बनून फिरत असल्याचं ते म्हणाले.

‘कुमकुम भाग्य’ आणि ‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येनं टीव्ही इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली आहे. 14 जून रोजी नालासोपारा इथल्या राहत्या घरी तिने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा होत आहे. रवी किशन यांनी आत्महत्येला मोठं पाप म्हणत असं केल्याने आत्म्याला कधीच मोक्ष मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने संचिता उगलेच्या प्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
संचिताने विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. गेल्या काही काळापासून ती नैराश्याचा सामना करत होती, असंही म्हटलं जात आहे. संचिताच्या कुटुंबीयांनीही याला दुजोरा दिला आणि त्यांच्या मुलीचा गेल्या काही काळापासून सतत मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप केला. अशातच संचिताचे व्हॉट्स अॅप चॅट्ससुद्धा लीक झाले आहेत. हे चॅट्स वाचल्यानंतर सहकलाकार उज्ज्वल शर्मा तिला त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे.
संचिताच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना रवी किशन ‘पीटीआय’शी म्हणाले, “आजकाल मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. नुकतीच एका 22 वर्षीय तरुण टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केली. ही अत्यंत दु:खद घटना आहे. म्हणूनच ध्यानसाधना करणं खूप महत्त्वाचं आहे. अध्यात्म आणि प्रार्थना या गोष्टी अत्यावश्यक आहेत. त्यातून आपल्याला काही प्रमाणात शक्ती मिळते.”
काय म्हणाले रवी किशन?
VIDEO | Gorakhpur: On TV Actress Sanchita Ugale’s demise, BJP MP Ravi Kishan (@ravikishann) says, “Just yesterday, one of our artists, a young television actress who was only 22 years old, died by suicide. It is very tragic. That is why meditation is important. Spirituality is… pic.twitter.com/PXi9ncF1tD
— Press Trust of India (@PTI_News) June 16, 2026
याविषयी रवी किशन पुढे म्हणाले, “या जगात असा कोणीही नाही, जो दु:खी नाही. पण आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही. हे सर्वांत मोठं पाप आहे. आत्महत्या केल्याने मुक्ती मिळत नाही. जे आत्महत्या करतात, ते आत्मे पिशाच्चांप्रमाणे भटकत राहतात. आयुष्यात सुख आणि दु:ख येतात – जातात. असा कोणीही नाही जो दु:खी होत नाही किंवा विचार करत नाही. पण आपल्याला त्या परिस्थितीतही जगायचं असतं. आत्महत्या हे सर्वांत मोठं पाप आहे. आत्म्याला त्याने कधीच मुक्ती मिळत नाही. जो कोणी असं टोकाचं पाऊल उचलतो, त्याचा आत्मा इथेच भटकर राहतो, कारण त्याचा मृत्यू ठरलेल्या वेळी झालेला नसते. असे आत्मे इथेच भूत बनून फिरत असतात.”
दरम्यान संचिताची मैत्रीण गीतांजलीने असा दावा केला आहे की, सहा महिन्यांपासून संचिता तिला सांगत होती की तिला मरायचं आहे, जगायचं नाही. हे कसलं आयुष्य आहे, हा तर मोठा छळ आहे, असं म्हणत ती गीतांजलीकडे रडायची.