“सलमान तर बिष्णोईपेक्षाही वाईट, त्याने ऐश्वर्याचा खांदा फ्रॅक्चर..”; एक्स गर्लफ्रेंडकडून धक्कादायक आरोप

अभिनेता सलमान खानवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने गंभीर आरोप केले आहेत. सलमानने ऐश्वर्याचा खांदा फ्रॅक्चर केला होता, असं ती म्हणाली. इतकंच नव्हे तर तो गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईपेक्षाही वाईट असल्याचं तिने म्हटलंय.

सलमान तर बिष्णोईपेक्षाही वाईट, त्याने ऐश्वर्याचा खांदा फ्रॅक्चर..; एक्स गर्लफ्रेंडकडून धक्कादायक आरोप
Salman Khan and Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2024 | 8:39 AM

अभिनेत्री सोमी अली ही सलमान खानला जवळपास आठ वर्षे डेट करत होती. सोमी अलीसोबतच्या नात्यामुळेच संगीता बिजलानीने सलमानसोबत लग्न मोडल्याचं म्हटलं जातं. सलमान आणि सोमीचं नातंही विविध कारणांमुळे चर्चेत होतं. ब्रेकअपनंतर सोमीने सलमानवर बरेच गंभीर आरोप केले. त्याने माझा छळ केला, असंही सोमीने म्हटलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सलमानची तुलना थेट गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईशी केली आहे. सलमानचं एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ आणि संगीता बिजलानी यांच्यासोबत अजूनही मैत्रीपूर्ण नातं आहे, मात्र तुझ्यासोबत तसं नातं का नाही, असा प्रश्न विचारल्यावर सोमी म्हणाली, “कारण सलमानने मला जशी वागणूक दिली, तशी त्याने कोणालाच दिली नाही. संगीता आणि कतरिना यांचा त्याने माझ्याइतका छळ केलाच नव्हता. पण त्याने ऐश्वर्या रायचा फार छळ केला होता. माझ्या मते त्याने ऐश्वर्याचा खांदासुद्धा फ्रॅक्चर केला होता. पण त्याने कतरिनासोबत काय केलं हे मला माहीत नाही.”

या मुलाखतीत सोमीने सलमानची गँगस्टर लॉरेन्स बिश्णोईशी तुलना केली. “सलमानने माझ्यासोबत जे केलं, ते पाहून मी असं नक्की म्हणू शकते की लॉरेन्स बिष्णोईसुद्धा त्याच्यापेक्षा चांगला असेल”, असं सोमी म्हणाली. यावेळी सलमानकडून मारहाण झाल्याचा एक प्रसंगसुद्धा तिने सांगितला. इतकंच नव्हे तर माझी अवस्था पाहून अभिनेत्री तब्बूच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं होतं, असं सोमी म्हणाली. “मला पाठदुखीचा खूप त्रास होता आणि बराच काळ मी बेडवरच झोपून होते. तब्बूने माझी अवस्था पाहिली होती आणि तिच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलं होतं पण सलमान मला भेटायला कधीच आला नव्हता”, असं सोमीने पुढे सांगितलं.

सोमीने असाही खुलासा केला की फक्त तिच्या आई आणि जवळच्या मित्रमैत्रिणींशिवाय कोणालाच तिच्या सलमानसोबतच्या नात्याविषयी पूर्ण माहिती नाही. सलमानसोबतच्या नात्याबद्दल एक पुस्तक लिहिणार असल्याचंही तिने सांगितलं. या पुस्तकात ती सलमान आणि तिच्या नात्याविषयी बरेच धक्कादायक खुलासे करणार आहे. सलमान ऐश्वर्याला डेट करू लागल्यानंतर सोमी अलीने त्याच्याशी ब्रेकअप केला. बॉलिवूडमधील चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ती 1999 मध्ये भारत सोडून गेली. सध्या सोमी ‘नो मोअर टीअर्स’ नावाची स्वयंसेवी संस्था चालवते. या संस्थेअंतर्गत ती कौटुंबिक हिंसाचार आणि मानवी तस्करीला बळी पडणाऱ्यांची मदत करते.