मुंबई हायकोर्टाने सलमानच्या शेजाऱ्याला भरला सज्जड दम; नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानच्या पनवेल इथल्या फार्महाऊसच्या शेजाऱ्याला सज्जड दम भरला आहे. सोशल मीडियावर कोणाचीही बदनामी करण्याचा अधिकार नाही, असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. नेमकं काय प्रकरण आहे, ते सविस्तर वाचा..

अभिनेता सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्कर यांच्यातील फार्महाऊसच्या जमिनीवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलंय की, सोशल मीडिया कोणालाही कोणत्याही व्यक्तीविरुद्ध, मग तो सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी, बदनामीकारक पोस्ट करण्याचा अधिकार देत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी सलमानचा शेजारी केतन कक्कर यांना सोशल मीडियावरील सलमानविरोधातील पोस्ट आणि व्हिडीओ काढून टाकण्याबद्दल विचार करण्यास सांगितलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सोशल मीडियाचा वापर का केला जात आहे, असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. केतन कक्कर हे एक सेवानिवृत्त अनिवासी भारतीय आहेत, जे अमेरिकेत राहत होते. त्यांची जमीन रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात सलमानच्या प्रसिद्ध ‘अर्पिता फार्म्स’ या फार्महाऊसजवळ आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
1990 च्या दशकात जेव्हा कक्कर कुटुंबाने सेवानिवृत्तीसाठी जमीन खरेदी केली, तेव्हा जमीन विकणाऱ्या कंपनीने त्यांची ओळख सलमान खानचे वडील सलीम खान यांच्याशी करून दिली होती. अनेक वर्षे दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध होते. जेव्हा जेव्हा कक्कर कुटुंब त्यांच्या प्रॉपर्टीला भेट देत असत, तेव्हा सलमानचं कुटुंब त्यांचं स्वागत करत असे. मात्र 2019 मध्ये या दोन्ही कुटुंबातील संबंध बिघडले. मला अचानक माझ्या स्वत:च्या जमिनीवर जाण्यास मनाई करण्यात आली, असा आरोप कक्कर यांनी केला आहे. हा संपूर्ण वाद पनवेलमधील अडीच एकर परिसरातील डोंगराळ जमिनीसंदर्भात आहे. ही जमीन त्यांची आहे, असा दावा केतन कक्कर यांनी केला आहे. सलमानच्या प्रभावाखाली येऊन महाराष्ट्र वन विभागाने या जमिनीचं वाटप रद्द केलं आणि एक मोठा गेट बांधून त्यांच्या जमिनीकडे जाण्याचा मार्गदेखील अडवण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे.
सलमानने फेटाळले आरोप
माझ्या जमिनीकडे जाणारे रस्ते अडवण्यात आले, वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आणि माझं पर्यावरणपूरक घर, गणपती मंदिर पाडण्यात आलं. माझी जमीन खाजगी वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी काही कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आला, असे गंभीर आरोप कक्कर यांनी सलमानविरोधात केले आहेत. तर दुसरीकडे सलमानने त्याच्याविरोधातील हे सर्व आरोप फेटाळले आहेत. सलमानच्या वकिलांनी म्हटलंय की, केतन कक्कर यांना खरेदी करायची असलेली जमिनीची खरेदी-विक्रीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं आणि त्यामुळे ती रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सलमानवर आरोप करण्यास सुरुवात केली.
कोर्टात घेतली धाव
आपापसांत हा वाद मिटवण्यात अपयश आल्यानंतर केतन कक्कर यांनी सोशल मीडियावर सलमानच्या फार्महाऊसशी संबंधित कथित बेकायदेशीर कृत्यांचे आरोप करणारे अनेक व्हिडीओ आणि पोस्ट अपलोड केले. यातील एका व्हिडीओमध्ये त्यांनी सलमानची तुलना बाबर आणि औरंगजेब यांच्याशी केली. तसंच गणपती मंदिर आणि अयोध्या मंदिराचा उल्लेख करून त्यांनी या वादाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलमानविरोधात सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या.
अखेर सलमानने केतन कक्कर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. या खटल्यात त्याने गुगल, युट्यूब, फेसबुक, एक्स आणि काही कंटेंट क्रिएटर्सनाही पक्षकार म्हणून नाव दिलं आहे. कक्कर यांना त्याच्याविरोधात कोणतीही आक्षेपार्ह वक्तव्ये किंवा व्हिडीओ पोस्ट करण्यापासून रोखावं, अशी मागणी सलमानने न्यायालयाकडे केली. या पोस्टमुळे केवळ त्याची प्रतिमाच मलिन होत नाहीये, तर जातीय तणावही वाढतोय, असा युक्तिवाद सलमानच्या वकिलांनी केला. मात्र कनिष्ठ न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने सलमानने अखेर मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं.
उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी सलमानचा अपमान करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नका, असे निर्देश केतन कक्कर यांना दिले. “सोशल मीडियावर सहज व्यक्त होता येतं, याचा अर्थ असा नाही की कोणाचीही त्यावर बदनामी करावी,” असा सज्जड दम मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.