पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

Salman Khan on CJP Protest : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. सलमान खानने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
Salman Khan on CJP Protest
Image Credit source: Google
| Updated on: Jul 22, 2026 | 11:51 PM

NEET पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली 20 जुलै रोजी संसद मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला तसेच अश्रुधूराचे गोळेही सोडले. या घटनेनंतर अनेक चित्रपट कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. मुंबईतही आंदोलन झाले असून त्यात अनेक कलाकार सहभागी झाले. आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान यानेही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. सलमान खानने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय…

सलमान खानने ट्विट करत म्हटले की, ‘हे आंदोलन अतिशय शांततापूर्ण होते. त्याला हिंसक वळण लागल्याचे पाहून मला खूप दुःख झाले. या आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांप्रती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि आपल्या देशातील विद्यार्थी अधिक चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आले आहेत, तसेच त्यांच्या पालकांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे, ही आनंदाची बाब आहे.’

विद्यार्थ्यांच्या भूमिकेचे कौतुक

पुढे सलमानने म्हटले की, ‘विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी अभ्यासाविषयीची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची जिद्द दाखवली आहे. हे आंदोलन योग्य दिशेने सुरू आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेने केले आहे. त्यांचे धैर्य आणि साहस प्रेरणादायी आहे. शिक्षणासाठीची त्यांची तळमळ आणि प्रेरणा पाहता, ही पिढी भारताचे नाव नक्कीच उज्ज्वल करेल.’

सरकार विद्यार्थ्यांना सहकार्य करेल अशी आशा…

सलमानने पुढे म्हटले की, ‘हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेतील आहे. याला राजकीय रंग देऊ नये. या आंदोलनाचे संपूर्ण श्रेय आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच मिळायला हवे. मला विश्वास आहे की सरकारही विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करेल आणि शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल. ही सर्वांसाठी फायदेशीर परिस्थिती ठरू शकते. सकारात्मक निर्णय व्हावा, अशी माझी अपेक्षा आणि प्रार्थना आहे. शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला देव आशीर्वाद देवो.

शिक्षण हा पुढचा ट्रेंड आणि फॅशन बनला पाहिजे. वर्षागणिक ते अधिक लोकप्रिय आणि आकर्षक व्हावे, इतके की परदेशातील विद्यार्थीही शिक्षणासाठी भारतात यावेत आणि भारत जगातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखला जावा.

 

 

Follow Us