दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करतेय का? चाहत्याच्या प्रश्नावर समंथाचं भन्नाट उत्तर

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली. नुकतंच तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका नेटकऱ्याने तिला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर समंथाने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलंय.

दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करतेय का? चाहत्याच्या प्रश्नावर समंथाचं भन्नाट उत्तर
Samantha Ruth Prabhu
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 18, 2023 | 8:48 AM

मुंबई : 18 डिसेंबर 2023 | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची विशेष छाप सोडणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने काही काळ कामातून ब्रेक घेतला आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामच्या ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका युजरने तिला तिच्या दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं. त्यावर समंथाने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. यावेळी तिने इतरही काही प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली.

‘सर्वांत वाईट वर्ष अखेर संपतंय’, असं एकाने लिहिलं. त्यावर समंथा म्हणाली, ‘मलाही तेच वाटतंय.’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘अनेकदा तुम्हाला असं वाटतं की आपण स्वत:ला खूप चांगल्याप्रकारे ओळखतो आणि तेव्हा आयुष्यात अचानक काही सरप्राइजेस येतात.’ त्यावर प्रतिक्रिया देताना समंथाने लिहिलं, ‘काही चांगले तर काही वाईट. पण यामुळेच तुमच्यातील एक वेगळी आणि अनोखी व्यक्ती सर्वांसमोर येते.’ तू चमत्कारांवर विश्वास ठेवते का, असाही प्रश्न एका चाहत्याने तिला विचारला. त्यावर समंथाने सकारात्मक उत्तर दिलं. ‘होय. माझा विश्वास आहे.’ नवीन वर्षात कोणत्या गोष्टीसाठी तू सर्वाधिक प्रार्थना करशील, असा प्रश्न विचारणाऱ्याला समंथाने ‘चांगलं आरोग्य’ असं उत्तर दिलं. गेल्या काही काळापासून ती मायोसिटीस या आजाराचा सामना करतेय.

या सेशनदरम्यान एका युजरने समंथाला पुन्हा एकदा लग्न करण्याबद्दल विचारलं. ‘तू दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करतेय का’, असं संबंधित युजरने तिला विचारलं. त्यावर उत्तर देताना समंथाने लिहिलं, ‘आकडेवारी पाहता ही वाईट गुंतवणूक ठरेल.’ यासोबतच ती काही हसण्याचे इमोजी पोस्ट करते. इतकंच नव्हे तर या उत्तरात समंथाने घटस्फोटाचं प्रमाण सांगणारा डेटासुद्धा पोस्ट केला.

समंथा आणि नाग चैतन्य 2010 पासून एकमेकांना डेट करू लागले होते. ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 29 जानेवारी 2017 रोजी दोघांचा हैदराबादमध्ये साखरपुडा पार पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच समंथा आणि नाग चैतन्य विभक्त झाले. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथाने सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर केला होता.