Shah Rukh Khan | कोण शाहरुख? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शाहरुख खानने रात्री 2 वाजता केला कॉल, म्हणाला..

गुवाहाटीमधील थिएटरबाहेर 'पठाण'विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी शाहरुखचे पोस्टरही जाळण्यात आले. याविषयी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना विचारलं असता 'कोण शाहरुख खान, मी त्याला ओळखत नाही' अशी अजब प्रतिक्रिया दिली होती.

Shah Rukh Khan | कोण शाहरुख? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शाहरुख खानने रात्री 2 वाजता केला कॉल, म्हणाला..
Shah Rukh Khan
Image Credit source: Youtube
| Updated on: Jan 22, 2023 | 1:39 PM

गुवाहाटी: अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. गुवाहाटीमधील थिएटरबाहेर ‘पठाण’विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी शाहरुखचे पोस्टरही जाळण्यात आले. याविषयी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना विचारलं असता ‘कोण शाहरुख खान, मी त्याला ओळखत नाही’ अशी अजब प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेच्या काही तासांनंतर त्यांनी शाहरुखविषयी एक ट्विट केलं. शाहरुखने मध्यरात्री 2 वाजता फोन केल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलं आहे.

‘बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मला फोन केला होता आणि आज पहाटे 2 वाजता आमचं बोलणं झालं. त्याच्या आगामी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटीमध्ये घटलेल्या घटनेबद्दल त्याने चिंता व्यक्त केली. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं आश्वासन मी शाहरुखला दिलं. याप्रकरणी चौकशी करून कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खात्री करू’, असं ट्विट त्यांनी केलं.

पठाण चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील काही सीन्सनाही हटवण्याची मागणी केली जात आहे. शुक्रवारी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी आसाममधल्या नरेंगी इथल्या थिएटरबाहेर पठाण चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्याचसोबत चित्रपटाचे पोस्टर्ससुद्धा जाळले होते.

याप्रकरणी जेव्हा मुख्यमंत्री हिमंत यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले “खानने मला फोन नाही केला. मात्र जेव्हा एखादी समस्या उपस्थित झाली तेव्हा वेळोवेळी मला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी फोन केला आहे. जर खानने मला फोन केला, तरच मी या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहीन. जर काही लोकांनी कायदा आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यांच्याविरोधात कारवाई होईल. त्याचसोबत गुन्हासुद्धा दाखल होईल.”