Rinku Singh | KKR च्या शानदार विजयानंतर शाहरुखसुद्धा झाला रिंकूचा फॅन; शेअर केला ‘पठाण’च्या अंदाजातील पोस्टर

मॅचमध्ये कोलकाता टीमची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण वेंकटेश अय्यर आणि कॅप्टन नितीश राणा यांच्यातील भागीदारीने कोलकाताला पुन्हा सामन्यात आणलं होतं. या दोघांनाही अल्झारी जोसेफने बाद करून कोलकाताला अडचणीत टाकलं होतं.

Rinku Singh | KKR च्या शानदार विजयानंतर शाहरुखसुद्धा झाला रिंकूचा फॅन; शेअर केला पठाणच्या अंदाजातील पोस्टर
Rinku Singh and Shah Rukh Khan
Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 10, 2023 | 8:47 AM

मुंबई : रविवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने गुजरात टायटन्सच्या घोडदौडीला लगाम घातला. अखेरच्या षटकात रिंकू सिंहने मारलेल्या पाच सिक्सच्या जोरावर हा विजय मिळवता आला. गुजरातकडून रशीद खानची हॅटट्रिक (37 धावांत 3 विकेट्स) व्यर्थ गेली. आधी बॅटिंग करत गुजरात टायटन्सने 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 204 अशी धावसंख्या उभारली होती. नंतर कोलकाताचा डाव रशीद खानच्या फिरकीसमोर अडखळला. पण अखेरच्या ओव्हरमध्ये रिंकूच्या फटकेबाजीने कोलकाताचा विजय साकार झाला. कोलकाताने 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 207 धावा केल्या. या अद्भुत खेळानंतर सोशल मीडियावर सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसह सेलिब्रिटींकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खाननेही ट्विट करत आनंद व्यक्त केला. शाहरुखने रिंकूचा खास अंदाजातील एक फोटो शेअर करत त्याचं तोंडभरून कौतुक केलं.

शाहरुखने ट्विटरवर रिंकूसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ‘पठाण’ या चित्रपटातील शाहरुखच्या लूकप्रमाणे रिंकूचा एडिट केलेला फोटो त्याने शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘झुमे जो रिंकू.. माझी मुलं रिंकू सिंह, नितीश राणा, वेंकटेश अय्यर तुम्ही शानदार कामगिरी केली. फक्त स्वत:मध्ये विश्वास असायला हवा. या विजयाबद्दल तुम्हाला शुभेच्छा.’ शाहरुखशिवाय सचिन तेंडुलकरनेही ट्विट करत रशीदच्या हॅटट्रिकचं कौतुक केलं आणि रिंकू सिंहला ‘स्पेशल’ म्हटलंय. अभिनेता रणवीर सिंगने ट्विटरवर लिहिलं, ‘रिंकू.. रिंकू.. रिंकू.. हे काय होतं?’ त्यावर उत्तर देताना रिंकूने लिहिलं, ‘फक्त देवाचा चमत्कार होता.’

मॅचमध्ये कोलकाता टीमची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण वेंकटेश अय्यर आणि कॅप्टन नितीश राणा यांच्यातील भागीदारीने कोलकाताला पुन्हा सामन्यात आणलं होतं. या दोघांनाही अल्झारी जोसेफने बाद करून कोलकाताला अडचणीत टाकलं होतं. विजयासाठी 6 चेंडूत 29 धावांची गरज असताना उमेद यादव आणि रिंकू सिंह ही जोडी एकत्र होती. हा विजय मिळवणं खरंतर आवाक्याबाहेरचं होतं. पण रिंकूने यशच्या पाच चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकत अशक्य वाटणारा विजय साकार केला.