बदनामी काय असते हे कळायला..; शिल्पा शिंदेनं ‘भाभीजी घर पर हैं’च्या निर्मात्यांना शिकवला असा धडा
अभिनेत्री शिल्पा शिंदेनं 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र हे आरोप खोटे होते, असा धक्कादायक खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. तिने असं का केलं होतं, यामागचं कारणसुद्धा सांगितलं आहे.

‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे नुकत्याच तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. शिल्पाने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडत निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्यावेळी केलेले हे आरोप खोटे होते, असा धक्कादायक खुलासा तिने आता दहा वर्षांनंतर केला आहे. ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर मी लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केल्याची कबुली शिल्पाने भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये दिली होती. यावरून सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिल्पाने पैशांसाठी खोटे आरोप केल्याचं काही नेटकरी म्हणत असून तिला प्रचंड ट्रोलसुद्धा केलं जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर शिल्पा पुन्हा एकदा ‘झूम/ टेली टॉक’ला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. “त्यावेळी मला खूप त्रास दिला जात होता. आज मी जर एखाद्या गोष्टीवर ठाम असेल, तर ते केवळ माझ्या प्रामाणिकपणामुळेच आहे. त्यावेळी माझ्यावर कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचा आरोप करण्यात आला होता. एकीकडे मालिका सुरू होती, दुसरीकडे मला काम करण्यापासून थांबवण्यात आलं होतं. मी यापुढे सेटवर येऊ नये, असं थेट मला सांगितलं गेलं. संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री माझ्याविरोधात गेल्याने मी पूर्णपणे एकटी पडली होती. मला बसून खायला-प्यायला देणारं कोणीच नव्हतं. म्हणून मी लढायला घाबरले नव्हते. जेव्हा एखाद्या प्रामाणिक आणि चांगल्या व्यक्तीवर कोणत्याही कारणाशिवाय चिखलफेक केली जाते, तेव्हा त्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होतो, ही गोष्ट जगासमोर येणं खूप गरजेचं होतं”, असं शिल्पा म्हणाली.
याविषयी तिने पुढे सांगितलं, “ज्याप्रकारे माझा छळ सुरू होता, माझ्या जागी दुसरी कोणतीही स्वाभिमानी मुलगी असती, तर तिने जीवच दिला असता. मीसुद्धा चिठ्ठीवर नाव लिहून माझं आयुष्य संपवलं असतं, पण चार दिवसांनी सगळे मोकळे होतील आणि मला पुन्हा भित्री म्हटलं जाईल. मी अवाजवी कपडे आणि पैशांची मागणी केल्याचा खोटा आरोप माझ्यावर करण्यात आला होता. यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला. माझा ‘सिंटा’ या कलाकारांच्या संस्थेकडूनही अपमान झाला होता. अखेर वैतागून मी ती मालिका सोडली होती. बदनामी म्हणजे नेमकं काय आणि जेव्हा एखाद्या निरपराध व्यक्तीची प्रतिष्ठा खराब होते, तेव्हा त्याला किती वेदना होतात, हे कायदेशीररित्या स्पष्ट करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं झालं होतं. त्यावेळी माझ्याकडे याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.”