‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’च्या दिग्दर्शकाने विवेक ओबेरॉयला म्हटलं ‘कृतघ्न’; नेमकं काय घडलं?

अभिनेता विवेक ओबेरॉयला एका बॉलिवूड दिग्दर्शकाने कृतघ्न असं म्हटलंय. विवेकच्या करिअरचा वाईट काळ सुरू असताना या दिग्दर्शकाने त्याला 'शूटआऊट ॲट लोखंडवाला'ची ऑफर दिली होती. त्यानंतर जेव्हा दिग्दर्शकाने त्याच्या दुसऱ्या चित्रपटासाठी विचारलं, तेव्हा विवेकने स्पष्ट नकार दिला होता.

शूटआऊट ॲट लोखंडवालाच्या दिग्दर्शकाने विवेक ओबेरॉयला म्हटलं कृतघ्न; नेमकं काय घडलं?
Vivek Oberoi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 25, 2024 | 3:48 PM

मुंबई : 25 जानेवारी 2024 | अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. यामधील त्याच्या अभिनय कौशल्याचं कौतुक होत आहे. मात्र विवेकच्या करिअरमध्ये एक टप्पा असा होता, जेव्हा त्याला चांगल्या चित्रपटांचे ऑफर्स मिळत नव्हते. अशा वेळी त्याला संजय गुप्ता निर्मित आणि दिग्दर्शित ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’ या चित्रपटात माया डोळसची भूमिका मिळाली होती. याच चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकसोबतचा किस्सा सांगितला. जेव्हा संजय गुप्ता यांनी ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’च्या काही वर्षांनंतर विवेकला ‘दस कहानियाँ’ची ऑफर दिली, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला होता. विवेकचं नकारार्थी उत्तर ऐकल्यानंतर संजय यांना तो कृतघ्न आणि उपकार विसरणारा कलाकार वाटला होता. त्यानंतर विवेकसोबत कधीच काम करणार नसल्याचं त्यांनी ठरवलं होतं.

युट्यूबर सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत संजय गुप्ता म्हणाले, “विवेकने माझ्या दस कहानियाँ या चित्रपटाला नकार दिला होता. त्याक्षणी मला तो अत्यंत कृतघ्न वाटला होता. इतर सर्व कलाकारांनी ‘दस कहानियाँ’मध्ये काम करण्यास होकार दिला होता. मात्र फक्त विवेकने त्यात काम करण्यास नकार दिला होता. माझं करिअर एका दिशेने जात असून आता मी अँथॉलॉजी चित्रपट करू नये असं मला वाटतं, हे कारण त्याने मला दिलं होतं. त्यावेळी मी त्याला काहीच बोललो नाही. पण मी मनात निश्चय केला होता की मी या मुलापासून लांबच राहीन. मी त्याच्यासोबत कधीच काम करणार नाही.”

या घटनेच्या बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा संजय गुप्ता ‘शूटआऊट ॲट वडाळा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत होते, तेव्हा विवेकनेच त्यांना एकत्र काम करण्याचं सुचवलं होतं. मात्र पुन्हा एकदा विवेकने ऐनवेळी चित्रपटातून माघार घेतली होती. तेव्हाचा किस्सा संजय गुप्ता यांनी या मुलाखतीत सांगितला. ते म्हणाले, “दिवाळीच्या दिवशी विवेक माझ्या घरी आला होता. चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर त्याने उठून मला मिठी मारली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो मला म्हणाला होता की मी परतलोय, मी हा चित्रपट करेन.”

संजय गुप्ता यांनी जेव्हा चित्रपटाची घोषणा केली, तेव्हा विवेकने त्यातून माघार घेतली होती. संजय दत्तच्या टीममधून कोणीतरी विवेकला कॉल केल्याने त्याने काम करण्यास नकार दिला होता. त्यावेळी संजय गुप्ता आणि संजय दत्त यांच्यात काही वाद सुरू होते. या वादामुळे गुप्ता यांनी बरेच चित्रपट गमावले होते. “संजय दत्तच्या टीममधून कोणीतरी बऱ्याच अभिनेत्याला फोन करून सांगत होतं की माझ्यासोबत काम करू नका. काही दिवसांनी मला विवेकने सांगितलं की तो माझ्या चित्रपटात काम करू शकत नाही. कारण त्याने संजय दत्तसोबतचा चित्रपट साइन केला आहे. तिथेच मी हरलो होतो,” अशा शब्दांत संजय गुप्ता यांनी भावना व्यक्त केल्या.