गायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली जबाबदारी

गायक गुरू रंधावाच्या दिल्लीच्या जिमबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..

गायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली जबाबदारी
Guru Randhawa and Lawrence Bishnoi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 11, 2026 | 9:40 AM

प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावाच्या मालकीच्या जिमबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील ही घटना असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर जिम परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप शेअर करत बिष्णोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बिष्णोई गँगमधील एक गुंड म्हणतोय, “अभिनेता सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे गुरू रंधावाला लक्ष्य करण्यात आलं आहे. हा फक्त ट्रेलर आहे.” या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी गुरू रंधावाच्या जिमच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. हे कृत्य खरोखरच एखाद्या टोळीचं आहे की कोणीतरी दहशत पसरवण्यासाठी बिष्णोईच्या नावाचा वापर करत आहे, हे निश्चित करण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची आणि सोशल मीडिया पोस्टच्या सत्यतेची पडताळणी केली जात आहे. त्यानंतरच परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल.

काळवीट शिकार प्रकरणापासून लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सतत अभिनेता सलमान खानला लक्ष्य केलं जात आहे. याआधी बिष्णोई गँगकडून सलमानच्या घराबाहेरही गोळीबार करण्यात आला होता. सलमानशी जवळीक साधणाऱ्यावर हल्ला केला जाईल, अशी सातत्याने धमकी या गँगकडून देण्यात येते. काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असतानाच अभिनेता रणवीर सिंहला व्हॉट्सअॅपवर धमकी मिळाली होती.

रणवीरच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली, तेव्हा अभिनेता सलमान खानच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकासोबतही अशीच घटना घडल्याची माहिती समोर आली होती. कॉमेडियन कपिल शर्माच्या परदेशातील हॉटेलवरही गोळीबार करण्यात आला होता. तेव्हासुद्धा सलमानवरून धमकी देण्यात आली होती. जो सलमानसोबत काम करणार, त्याचा गेम ओव्हर होणार, अशी धमकी कपिल शर्माला देण्यात आली होती. काळवीर शिकार प्रकरणापासूनच बिष्णोई समाजाचा सलमानवर खूप राग आहे. त्याच प्रकरणामुळे लॉरेन्स बिष्णोईकडून सतत सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.

Follow Us