‘धुरंधर 2’बद्दल ‘सिंघम’च्या जयकांत शिक्रेची अशी पोस्ट; नेटकऱ्यांकडून उलट ट्रोल

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या साऊथ सुपरस्टार्सवर प्रकाश राज यांनी निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'बद्दलही त्यांनी एक खोचक पोस्ट लिहिली आहे.

धुरंधर 2बद्दल सिंघमच्या जयकांत शिक्रेची अशी पोस्ट; नेटकऱ्यांकडून उलट ट्रोल
Ranveer Singh and Prakash Raj
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2026 | 11:42 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक करणाऱ्या दाक्षिणात्य कलाकारांना अभिनेते प्रकाश राज यांनी फटकारलं आहे. एका मुलाखतीत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं होतं की ‘धुरंधर 2’ हा चित्रपट साऊथ सिनेमांच्या वर्चस्वाला कमी करेल. त्यानंतर रामचरण, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर, महेश बाबू आणि विजय देवरकोंडा यांसारख्या प्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकारांनी ‘धुरंधर 2’ आणि या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं. त्यावरून प्रकाश राज यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रकाश राज हे विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली मतं बेधडकपणे मांडतात. त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्यांच्या घरातील एका कोपऱ्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रेडिओवर ‘अभी ना जाओ छोडकर.. के दिल अभी भरा नहीं’ हे गाणं वाजतंय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मी धुरंधरपासून खूप लांब आहे, तुम्हीसुद्धा का?’ रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटावर ‘प्रचारकी’ असल्याची टीका झाली. चित्रपटाच्या अशा मुद्द्यांकडे स्पष्ट दुर्लक्ष करत त्याचं कौतुक करणाऱ्यांना त्यांनी सुनावलं आहे.

प्रकाश राज यांनी एक ट्विट त्यांच्या अकाऊंटवर रीट्विट केलं होतं. ‘धुरंधर 2 या चित्रपटाचं अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा, ज्युनियर एनटीआर आणि महेश बाबू यांनी कौतुक केलं आहे. कोणत्या बॉलवूड स्टार्सनी ट्विट केलंय का’, अशा आशयाचं हे ट्विट होतं. त्यावर प्रकाश राज यांनी टोला लगावत लिहिलं, ‘जबाबदाऱ्याचं ओझं आता साऊथपर्यंतही पोहोचू लागलंय.’ याचा अर्थ, आता दाक्षिणात्य कलाकारांनाही सांगण्यात येत आहे की त्यांना सोशल मीडियावर एखाद्या चित्रपटाचं कौतुक करावं लागेल, ही त्यांची ड्युटी आहे.

प्रकाश राज हे सुरुवातीपासूनच भाजप आणि त्याच्या धोरणांचे टीकाकार राहिले आहेत. त्यांनी वारंवार भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले असून यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडले आहेत. कन्नड अभिनेत्री रम्या स्पंदन हिनेसुद्धा या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. तर युट्यूबर ध्रुव राठीने दिग्दर्शिक आदित्य धरला भाजपचा प्रचारक असल्याचं संबोधन त्याच्यावर निशाणा साधला आहे. चित्रपटावर काही वर्गाकडून टीका होत असतानाही बॉक्स ऑफिसवर मात्र त्याची जोरदार कमाई सुरूच आहे. पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Follow Us