उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको..; भोंदू अशोक खरातप्रकरणी सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट

भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. आमच्याच धर्मातली अंधश्रध्दा का दिसते, असं आपण अजूनही म्हणणार का, असा सवाल सोनालीने उपस्थित केला आहे.

उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको..; भोंदू अशोक खरातप्रकरणी सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट
Ashok Kharat and Sonalee Kulkarni
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2026 | 12:07 PM

लैंगिक छळाचे आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथक (एसआयटी) करत आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरोधात आतापर्यंत एकूण 10 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यापैकी आठ प्रकरणं लैंगिक छळ आणि शोषणाशी संबंधित आहेत, तर दोन फसवणुकीची आहेत. एसआयटीला आतापर्यंत खरातविरोधात फोनद्वारे 100 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, यावरूनच या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येत आहे. याप्रकरणी सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सोनाली कुलकर्णीची पोस्ट-

‘आता तरी श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेऊयात. महिलांवर घृणास्पद अत्याचार, लैंगिक खुळाचार, आर्थिक फसवणूक, ऐय्याशी, भावनिक शोषण.. दांभिकता.. किती संतापजनक, केवढी पिळवणूक. अजूनही आपण म्हणणार का की, आमच्याच धर्मातली अंधश्रध्दा का दिसते? आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको? की माझी ती पवित्र अस्वच्छता आणि दुसऱ्याची ती दुर्गंधी? महाराष्ट्रात, आपल्या भवताली हे घडतंय. आपण ठगले जातोय.. जागे होऊया,’ अशी पोस्ट सोनालीने खरातप्रकरणी लिहिली आहे.

स्वत:च्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात सध्या कोठडीत आहे. खरातच्या अटकेनंतर 58 रहस्यमय व्हिडीओ पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये अनेक बड्या हस्ती तसंच राजकीय नेत्यांचाही संबंध असण्याची दाट शंका व्यक्त होत आहे.

याआधी अभिनेता अतुल कुलकर्णीनेही याप्रकरणी विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली होती. ‘पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’? त्या आधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते? ज्या वेळी कुणी ‘महाराज’ भोंदू ‘निघतात’, तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण होतात? भागीदार, पीडित, आंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी? हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)?, असा सवाल त्याने केला होता.

Follow Us