32 वर्षांपूर्वीचं प्रचंड लोकप्रिय गाणं, आजही ऐकू येताच अनेकजण धरतात ठेका, श्रीदेवीच्या सौंदर्याने लावलेलं वेड
श्रीदेवी यांचं 32 वर्षांपूर्वीचं प्रचंड लोकप्रिय गाणं, ज्यामधील त्यांचं सौंदर्याने चाहत्यांना लावलेलं प्रचंड वेड. आजही या गाण्याचे आहेत लाखो चाहते. श्रीदेवी यांनी 21 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स.

बॉलिवूडच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत, जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली तरी प्रेक्षकांच्या मनातून ते चित्रपट आजही कायम आठवणीत आहेत. अभिनेत्री श्रीदेवी आणि महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘खुदा गवाह’ हा त्यापैकीच एक चित्रपट आहे. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेम, शौर्य, अफगाणिस्तानची संस्कृती आणि भावनिक नात्यांची अनोखी कहाणी रुपेरी पडद्यावर मांडली. विशेष म्हणजे, या चित्रपटातील श्रीदेवींचा लूक आणि त्यांचा दमदार अंदाज आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे.
दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी तयार केलेल्या ‘खुदा गवाह’मध्ये श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे बेनजीर आणि बादशाह खान या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. अफगाणिस्तानच्या सुंदर डोंगररांगा, पठाणी संस्कृती आणि भव्य लोकेशन्समुळे चित्रपटाला एक वेगळीच ओळख मिळाली होती.
‘तू ना जा मेरे बादशाह’ गाणं आजही लोकप्रिय
या चित्रपटातील ‘तू ना जा मेरे बादशाह’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. या गाण्यात श्रीदेवींचा पारंपरिक आणि राजेशाही अंदाज पाहायला मिळतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा हा लूक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता. इतकंच नाही तर चित्रपटात श्रीदेवी तलवार चालवतानाही दिसल्या होत्या. त्यांच्या व्यक्तिरेखेतील नाजूकपणा आणि धाडसीपणा या दोन्ही गोष्टी या चित्रपटातून ठळकपणे समोर आल्या होत्या.
या गाण्याला मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांनी आवाज दिला होता. गाण्याला संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिलं, तर गीतकार आनंद बक्षी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले होते. गाण्याच्या संगीतामध्ये अफगाणी लोकसंगीताची झलक जाणवते, त्यामुळे त्याला एक वेगळीच भावनिक रंगत मिळाली आहे.
अशी आहे ‘खुदा गवाह’ची कथा
‘खुदा गवाह’ची कथा अफगाणिस्तानातील एका गावापासून सुरू होते. बादशाह खान हा अमिताभ बच्चन यांनी साकारलेला एक शूर पठाण योद्धा असतो. बुज्कशीच्या खेळादरम्यान त्याची भेट बेनजीरशी होते. या भेटीतून दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं.
बेनजीर बादशाहसमोर लग्नासाठी एक अट ठेवते. तिच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांच्या मारेकऱ्याचं, हबीबुल्लाहचं, शीर घेऊन यावं, अशी तिची अट असते. हबीबुल्लाह भारतातील तुरुंगात कैद असतो. आजही या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.